
जळगाव मिरर | १७ जून २०२५
भुसावळ शहरातील जळगाव रोडवरील अंगारा ढाब्यावर जेवण केल्यानंतर बिल मागितल्याच्या कारणावरून ढाबा मालकास चाकू दाखवत लुटमार, शिवीगाळ व मारहाणीचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, रोशन होलाराम सचदेव (वय ४०, रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १४ जून रोजी संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास तस्लीम उर्फ काल्या सलीम शेख व शेख नईम शेख सलीम हे दोघे ढाब्यावर आले होते. दारूच्या नशेत त्यांनी जेवण करून बिल मागितल्यावर सचदेव यांना शिवीगाळ केली व चाकू दाखवून धमकावले.
यानंतर त्यांच्या इतर साथीदारांना बोलावून मिळून मारहाण करण्यात आली. या टोळक्यात वसीम शेख, सलीम शेख, आशु ठोंबरे, आरान शेख, आकाश लोंधे, आदिल खान, शेख वसीम शेख चाँद यांचा समावेश होता. या सर्वांनी मिळून ढाबा मालकाच्या खिशातील पाच हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले, तसेच दर महिन्याला खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणावर नंतरच्याच वेळेस रात्री १० वाजता आरोपींनी सचदेव यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांच्या पत्नी व मुलाला देखील मारहाण केली. यावेळी आरोपी शेख सलीमच्या हातात तलवार होती. परिसरातील नागरिकांनी प्रसंगावर मध्यस्थी करत कुटुंबाला वाचवले.
या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे, विजय नेरकर, सचिन चौधरी, योगेश माळी, मोहसीन शेख आणि जावेद शहा यांच्या पथकाने शेख सलीम शेख सिकंदर (वय ६०), आकाश अशोक लोधे (वय २१), आणि शेख वसीम शेख चाँद (वय ३८) यांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे तपास करत आहेत.