जळगाव मिरर । २६ ऑक्टोबर २०२५
पारोळा तालुक्यातील भोकरबारी येथील शेतकरी पिकांवर फवारणी करत असतांना ३ दिवसांपूर्वी त्यांना विषबाधा झाली होती. उपचारादरम्यान त्यांचा शुक्रवारी दुपारी दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, भोकरीबारी येथील समाधान रमेश पाटील (वय ३३) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, समाधान पाटील हे २९ रोजी निम्मेबटाईने करत असलेल्या आपल्या शेतातील पिकांवर फवारणी करण्यासाठी गेले होते. दरम्यान, त्यांच्या नाका-तोंडात विषारी औषध गेल्याने त्यांना सायंकाळी घरी परत आल्यावर चक्कर येऊन अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना तत्काळ कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दोन दिवस त्या ठिकाणी उपचार केल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना शुक्रवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास समाधान पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी त्यांचे मामा संजय धनसिंग पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून पारोळा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.





















