
जळगाव मिरर | २५ ऑगस्ट २०२५
राज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने आपले राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर यांच्यासह अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे आणि सुबोध जाधव यांना पक्षातून बडतर्फ केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून खेडेकर यांच्या भारतीय जनता पक्ष (भाजप) किंवा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर मनसेने कठोर पाऊल उचलत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. या निर्णयामुळे कोकणातील मनसेच्या संघटनात्मक रचनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
वैभव खेडेकर हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जवळचे सहकारी आणि कोकणातील प्रमुख नेते मानले जातात. 2006 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केली, तेव्हापासून खेडेकर त्यांच्यासोबत होते. कोकणात, विशेषत: दापोली आणि खेड परिसरात, मनसेच्या संघटनात्मक उभारणीत खेडेकर यांचा मोठा वाटा आहे. खेडेकर यांनी 2014 मध्ये दापोली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तरीही, त्यांनी खेड नगरपरिषद निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि स्वत: खेडचे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांच्या आक्रमक नेतृत्वशैलीमुळे आणि तरुणांमधील लोकप्रियतेमुळे खेड आणि दापोली परिसरात त्यांचा मजबूत जनसंपर्क आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वैभव खेडेकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला होता. दापोलीत नुकत्याच झालेल्या महायुतीच्या एका कार्यक्रमात खेडेकर व्यासपीठावर उपस्थित होते, जिथे महायुतीच्या नेत्यांनी त्यांना भाजपमध्ये सामील होण्याची जाहीर ऑफर दिली होती. खेडेकर यांनी या वृत्तांचा इन्कार केला असला, तरी त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित असल्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर मनसेने खेडेकर यांच्यासह इतर तीन नेत्यांना पक्षातून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला.
मनसेने वैभव खेडेकर, अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे आणि सुबोध जाधव यांना पक्षातून बडतर्फ करताना पत्राद्वारे स्पष्ट केले आहे की, त्यांनी पक्षाच्या नियमांचे आणि धोरणांचे उल्लंघन केले तसेच पक्षविरोधी कारवाया केल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाने या नेत्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता थेट हकालपट्टी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.





















