जळगाव मिरर | १२ एप्रिल २०२५
अमळनेर तालुक्यातील मारवड येथील डांगरी रस्त्याला असलेल्या खळवाडीस अचानक आग लागल्याची घटना ११ रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. अचानक लागलेल्या या आगीत पाच ते सहा शेतकऱ्यांच्या खळ्यातील शेती साहित्य, एकाचे ट्रॅक्टर, चारा, लाकडी अवजारे आदी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे.
आगीचे वृत्त कळताच अमळनेर पालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी दोन अग्निशमन बंब घटनास्थळी रवाना केले होते. तसेच चोपडा, एरंडोल आणि धरणगाव येथील बंब ही बोलावण्यात आले होते. अग्निशमन दलाचे कर्मचारी गणेश गोसावी, दिनेश बिऱ्हाडे, फारुख शेख, जफर पठाण, मच्छिंद्र चौधरी, आनंद झिम्बल, आकाश बाविस्कर, भिका संदानशिव यांनी ही आग विझवली. सुदैवाने शेतकऱ्यांनी आपापली जनावरे तेथून काढून घेतल्याने गुरांचे नुकसान झाले नाही. दरम्यान, घटनेचे वृत्त कळताच उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, एपीआय जीभाऊ पाटील, मारवडचे पोलीस, तलाठी महेंद्र भावसार, मंडळाधिकारी, गावकऱ्यांसह विलास पाटील, उमाकांत साळुंखे यांचे सहकार्य लाभले. सुमारे सात शेतकऱ्यांचे खळे व शेती साहित्य जळून खाक झाले आहे.
आगीचे वृत्त समजताच गावातील नळांना पाणी सोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे सर्व गावातील तरुण धावत घटनास्थळी पोहोचले. यात कुणी पाणी टाकत होते, कुणी चारा मोकळा करून पाणी मारत होते, कुणी पावडीने चारा आवरत होते, तर काही जण बादल्या भरून भरून आग विझवण्यासाठी धावपळ करत होते. अग्निशमन दलाच्या गाड्या येण्यापूर्वी तरुणाईने केलेले धाडस आणि तत्परता कौतुकास्पद होती.