जळगाव मिरर | २८ जून २०२४
देशातील लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर एमआयएमचे नवनिर्वाचित खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी घेतलेल्या शपथविधीचाही व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यांनी संसदेत शपथविधी सोहळ्यात जय पॅलेस्टाईन म्हणत वाद निर्माण केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूं यांना पत्र लिहून असदुद्दीन ओवैसींनी जय पॅलेस्टाईन म्हणत केलेल्या घोषणेवर आक्षेप घेतला आहे. इतकेच नाही तर राणा यांनी असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी देखील केली आहे.
खासदार ओवैसींकडून भारतीय संविधानाचे उल्लंघन झाल्याचा आरोप नवनीत राणा यांनी लिहिलेल्या पत्रात केला आहे. तसेच माजी खासदार राणा यांनी असदुद्दीन ओवैसींच्या शपथविधीवरुन त्यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी देखील केली आहे. भारतीय संविधानाच्या कलम 102/103 नुसार असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रद्द करण्यात यावी, असे त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. ओवैसी यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेताना, जय पॅलेस्टाईनचा नार देत आपली शपथ पूर्ण केली होती. त्यामुळे, देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी ही घातक बाब असून त्यांनी शपथ घेताना भारतीय संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप राणा यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रातून केला आहे.
18 व्या लोकसभेच्या कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी बिस्मिल्लाचे पठण करून खासदार म्हणून शपथ घेतली. खासदार म्हणून शपथ घेताना त्यांनी ‘जय भीम, जय तेलंगणा’ आणि नंतर ‘जय पॅलेस्टाईन’ची घोषणा दिली. त्यानंतर भाजप खासदारांनी संसदेत गदारोळ सुरू केला होता. तर, सोशल मीडियातूनही त्यांच्या या शपथेवर टीका करण्यात आली आहे. त्यानंतर आता नवनीत राणा यांनी थेट राष्ट्रपतींकडे या बाबबतची तक्रार केली आहे.