
जळगाव मिरर | २६ ऑगस्ट २०२५
एरंडोल तालुक्यातील उमरदे गावाजवळच्या रस्त्यावर 31 मे 2025 रोजी झालेल्या सवमर्सीबल व सोलर पंप चोरीच्या प्रकरणाचा अखेर पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार संशयित आरोपींना अटक करून गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला असून, त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेल्या मालमत्तेचा तपास सुरू आहे.
सविस्तर वृत्त असे कि, एरंडोल पोलीस स्टेशन येथे सी.सी.टी.एन.एस. गु.र.नं. 93/2025 नुसार भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात 2,35,000 रुपये किंमतीचे सवमर्सीबल व सोलर पंप चोरीस गेले होते. गुन्हा हा उमरदे (ता. एरंडोल) गावाजवळ रस्त्यावर घडला होता. सदर गंभीर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील यांच्या आदेशानुसार विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे, पोहेकाँ. संदीप पाटील, हरीलाल पाटील, प्रविण मांडोळे, पोकाँ. राहुल कोळी, चपोहेकों. दीपक चौधरी यांचा समावेश होता.
तपासादरम्यान पथकाला गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींचा माग काढण्यात यश आले. त्यानुसार 25 ऑगस्ट 2025 रोजी नागदुली गावाजवळील पद्मालय फाटा येथे संशयित आकाश लालचंद मोरे (रा. मुगपाठ, ता. एरंडोल) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने सदर चोरी भरत बाबुराव बागुल, पृथ्वीराज रतीलाल पाटील आणि पंकज रवि बागुल यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली.
त्यानंतर पुढील कारवाई करत पथकाने खालील आरोपींना अटक केली: आकाश लालचंद मोरे, वय 23, रा. मुगपाठ (पदमालय), ता. एरंडोल भरत बाबुराव बागुल, वय 32, रा. केवडीपुरा, एरंडोल पृथ्वीराज रतीलाल पाटील, वय 20, रा. वरखेडी, ता. एरंडोल
(पंकज रवि बागुलचा तपास सुरू असल्याचे मानले जाते) या आरोपींना ताब्यात घेऊन एरंडोल पोलीस ठाण्यात पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी हजर करण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीय गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईमुळे एरंडोल परिसरात पोलीस दलाच्या तपास कौशल्याबद्दल कौतुकाचे वातावरण निर्माण झाले असून, चोरीसारख्या गुन्ह्यांवर पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि अचूकतेमुळे जनतेत विश्वास वाढला आहे. पुढील तपास सुरू असून, आरोपींकडून आणखी गुन्ह्यांची माहिती मिळण्याची शक्यता आहे.




















