जळगाव मिरर | ५ जानेवारी २०२४
पाचोरा शहराकडून जळगावकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाने गोराडखेडा गावाजवळ दोन शाळकरी मुली आणि दोन वृद्धांना चिरडल्याची घटना गुरुवारी पावणेसहा वाजेच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात एक वृद्ध व एक शालेय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. तर एका गंभीर जखमी झालेल्या वृध्दाला जळगावला हलवण्यात आले आहे. तर दुसऱ्या विद्यार्थिनीवर पाचोऱ्यात उपचार सरू आहेत. दरम्यान, अपघातानंतर तेथून जाणाऱ्या पोलिसांनी त्यांच्या गाडीतच चारचाकीमधील पाच ही जणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे गाठले. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत रास्तारोको करुन अपघातग्रस्त कार जाळली.
मिळालेल्या माहितीनुसार, गोरखेडा येथे गुरुवारी सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास शाळेतून मुले तर शेतातून काही शेतकरी व शेतमजुर घराकडे येत होते. याच वेळी पाचोऱ्याकडून लाल रंगाची स्विप्ट डिझायर ही भरधाव चारचाकी वेगाने जळगाव कडे जात होती. गोडारखेडा गावाजवळ याच वेळी पी. के. शिंदे शाळेतील नववीत शिक्षण घेणाऱ्या दुर्वा भागवत पाटील (वय १५) व ऋतुजा राजू भोईटे (वय १५) या विद्यार्थिनी सायकलीवर घराकडे येत होत्या, तर सुभाष रामा पाटील (वय ६०) व परशुराम दगा पाटील (वय ५२) हे देखील घराकडे जात होते. या भरधाव चारचाकीने या चारही जणांना चिरडले. यात परशुराम पाटील हे वाहनासह गाडीत अडकल्याने ही चारचाकी गावाजवळच थांबली. ही घटना इतकी भीषण होती की, अपघातानंतर काही क्षणातच सुभाष दगा पाटील व दुर्वा भागवत पाटील यांचा मृत्यू झाला. तर परशुराम पाटील यांना उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले असून ऋतुजा भोईटे या विद्यार्थिनीवर पाचोऱ्यात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ग्रामस्थांनी तत्काळ अपघातस्थळ गातून चारचाकीने उडवून दिलेल्या सर्वांना रस्त्यालगतच्या शेतातून उचलून आणले. त्याच दरम्यान, जळगावकडून येणाऱ्या पोलीस गाडीने अपघातग्रस्त चारचाकीत बसलेल्या पाच तरूणांना तत्काळ पाचोरा पोलिसात आणले. या प्रकरणी पाचोरा पोलिसात उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, ही घटना इतकी भीषण होती की, चारचाकी गाडीत अडकलेल्या जखमीला बाहेर काढण्यासाठी गाडी उलटी करावी लागली. दरम्यान, जळगावकडून येणाऱ्या पोलीस गाडीने तत्काळ हिट अॅण्ड रन करणाऱ्या चारचाकी गाडीतील चालकासह चार तरूणांना ताब्यात घेतले. यामुळे गोराडखेडा ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत रस्तारोको सुरुच ठेवला होता. या वेळी काही संतप्त नागरिकांनी अपघातग्रस्त चारचाकीला आग लावल्याचे समजते.