
जळगाव मिरर | ३ एप्रिल २०२६
तप्त उन्हाळ्यामुळे रक्तसाठ्यात घट होत असताना गंभीर व पीडित रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे यासाठी स्वयंस्फूर्त रक्तदान करणे अत्यंत गरजेचे असल्याचे आवाहन सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान चळवळीत सक्रिय असलेले मुकुंद गोसावी यांनी केले आहे.
आपल्या शारीरिक व्यंगावर मात करत समाजसेवेचा ध्यास घेतलेल्या मुकुंद गोसावी यांनी श्री हनुमान जयंती तसेच आपल्या आई-वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ नुकतेच रक्तदान करून एक आदर्श निर्माण केला. या निमित्ताने त्यांनी नागरिकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती करत स्वयंस्फूर्त सहभागाचे आवाहन केले.
गोसावी म्हणाले की, “रक्तदान केल्याने कोणताही शारीरिक त्रास, कमजोरी किंवा दुष्परिणाम होत नाही. उलट मनाला समाधान, आनंद आणि स्फूर्ती मिळते. विशेष आहाराची गरज नसून आपण रोजचे जे अन्न घेतो ते पुरेसे असते. मी स्वतः नियमित रक्तदान करतो आणि मला कोणताही त्रास जाणवलेला नाही.”
सध्या थॅलेसीमिया, हिमोफिलिया, सिकलसेल यांसारख्या आजारांनी त्रस्त रुग्ण, रक्तक्षय असलेल्या महिला, गर्भवती माता तसेच आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत असते. मात्र, उन्हाळा व बदलत्या वातावरणामुळे रक्तसंकलनात घट झाल्याने अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्तटंचाई निर्माण होत आहे.
अशा परिस्थितीत स्वयंस्फूर्त रक्तदान हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. “कुठलाही ऋतू असो, १८ वर्षांवरील आणि किमान ५० किलो वजन असलेली कोणतीही व्यक्ती रक्तदान करू शकते. समाजातील प्रत्येकाने ही जबाबदारी ओळखून पुढे यावे,” असेही त्यांनी आवाहन केले.
रक्तदान म्हणजे जीवनदान
रक्तदानाच्या या पवित्र कार्यातून अनेकांना नवजीवन मिळू शकते. त्यामुळे नागरिकांनी भीती व गैरसमज दूर करून मोठ्या संख्येने रक्तदानात सहभागी व्हावे, असे आवाहन मुकुंद गोसावी यांनी केले आहे.





















