जळगाव मिरर | ११ जुलै २०२५
जामनेर तलुक्यतील पहूर येथे सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना १० जुलैला सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास पहूर येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सविस्तर वृत्त असे कि, ऋषिकेश समाधान खाटीक (वय १९) असे मृत तरुणाचे नाव असून तो आपल्या आजोबांसोबत राहून शिक्षण घेत होता. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी ऋषिकेश हा आजोबा पांडुरंग गोविंदा खाटीक यांच्या शेतात फवारणीसाठी गेला होता. हौद भरताना ऋषिकेशचा तोल गेल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे तो बेशुद्ध अवस्थेत विहिरीत पडला आणि बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, तो न आल्याने घरच्यांनी त्याचा शोध घेतला असता विहिरीजवळ सायकल व ऋषिकेशच्या चपला दिसल्या. त्यानंतर विहिरीत पाहिले असता ऋषिकेशचा मृतदेह पाण्यात आढळला. तर त्याला तत्काळ पाण्याबाहेर काढून पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी करुन वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण पाटील यांनी त्यास मृत घोषित केले. दरम्यान, दुर्दैवी ऋषिकेशचे मातृछत्र हरपले होते.
तर वडिलांनी दुसरा विवाह केल्यामुळे तो आजोबांच्या छायेखालीच वाढला. फर्दापूर येथे त्याने उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. सैन्यात भरती होण्याचे ऋषिकेश याचे स्वप्न होते अन् त्यासाठी तो झपाटून मेहनत करत होता, त्याचे हे स्वप्न अपूर्णच राहिले आहे. त्याच्या दुदैवी निधनाने परिसरात ह-ळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, ११ जुलैला सकाळी ऋषिकेशवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
