
जळगाव मिरर | १२ जून २०२५
जळगाव शहरात विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने दि. ११ रोजी रात्री आठच्या हजेरी लावली. या वादळी पावसामुळे शहरातील झाडे कोसळून रस्ते अडले होते. नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. मेहरूण येथे संतोष चिंधु तायडे यांची गाय वीज पडून ठार झाली.
जळगाव-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पॉलीटेक्निक कॉलेजपासून बांभोरी कॉलेजपर्यंत अनेक झाडे रस्त्यावर कोसळल्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने झाडे हटवण्याचे काम स रू केले होते. वादळामुळे शहरातील अनेक घरांच्या आणि दुकानांच्या पत्रे उडून गेले असून, मोठ्या प्रमाणावर मालमत्ता हानी झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. यासंदर्भातील अधिकृत पंचनाम्यासाठी प्रशासनाने आज सकाळपासून चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान रात्री उशिरा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेत होते. जामनेर शहरातही जोरदार पाऊस झाल्याने तेथील जनजीवनही काही काळ विस्कळीत झाले होते. जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची तीव्र सक्रियता सुरू असल्यामुळे सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चोपडा तालुक्यातील पळासखेडा मिरा येथे प्रियानी बरेला (३४) ही आदिवासी महिला झाडाखाली आसरा घेत असताना चिंचेचे झाड तिच्यावर कोसळून जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत झाडाच्या आडोशाला उभे असलेले इतर १५ जण जखमी झाले आहेत. पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथे पितांबर वाघ (५०) यांचा वीज पडून मृत्यू झाला. तर एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथे नारायण पाटील (६८) यांना वादळात उडालेल्या पत्र्यांचा फटका बसून मृत्यू झाला.
दरम्यान, जळगाव शहरातील मेहरूण परिसरात वीज कोसळून संतोष तायडे यांच्या गायीचा मृत्यू झाला. शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. चारचाकी व दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही भागात घरांवरील पत्रे उडून गेल्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसानही झाले आहे. या आपत्तीनंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व आपत्ती व्यवस्थापनाचे निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी तात्काळ नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. महापालिका, महावितरण, वाहतूक पोलीस आणि इतर यंत्रणांनी मदतकार्य सुरू केले असून, मध्यरात्रीपर्यंत काही भागांतील वाहतूक आणि वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी थांबण्याचे आणि झाडांच्या आडोशाला न थांबण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. गुरुवारपासून वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून, बाधित नागरिकांना मदत दिली जाणार आहे.