जळगाव मिरर । २५ ऑक्टोबर २०२२
दिवाळीच्या दिवसात सर्वत्र आनंदमय वातावरण असताना देशाच्या सीमेवरून एक दुःखद बातमी आली आहे. राज्यातील एका जवानाला वीरमरण आले आहे. आसामच्या सीमावर्ती भागात कर्तव्यावर असलेल्या नाशिकच्या लहिवत येथील लान्सनायक संतोष गायकवाड यांना वीरमरण आलं आहे. त्यांच्या मागे आई-वडील, दोन भाऊ, पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. सर्वत्र दिवाळीचा सण साजरा होत असताना अचानक ही बातमी आल्यानं संपूर्ण लहिवत गावावर शोककळा पसरली आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजता त्यांच्या पार्थिवावर मूळगावी अंत्यसंस्कार होणार आहेत.
वीरमरण आलेले गायकवाड हे तोफखाना केंद्राच्या २८५ मीडियम रेजिमेंटमध्ये होते. सध्या ते आसाममधील लंका नावाच्या पोस्टवर तैनात होते. सिक्कीमच्या उत्तरेकडील हा भाग उंचावर असल्यानं सातत्यानं बर्फाच्छादित असतो. उणे १५ डिग्री तापमान असणाऱ्या इथल्या रक्त गोठवणाऱ्या थंडीत भारताच्या सीमेचं संरक्षण करत असताना त्यांना अतिथंडीचा त्रास झाला. थेट मेंदूवर याचा परिणाम झाल्यानं त्यांना कोलकात्यातील रुग्णालयात हालवण्यात आलं. या ठिकाणी त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली पण उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ऐन दिवाळीत गावात दिवाळीचा उत्साह असताना अचानक ही बातमी आल्यानं गायकवाड कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहेत. तर गावावरही शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
