
जळगाव मिरर | १३ ऑगस्ट २०२५
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबईकडे धडकणार असलेले मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राज्यात जातीय दंगल पेटवण्याचा कट रचल्याचा आरोप करत त्यांनी फडणवीसांवर थेट निशाणा साधला आहे.
“29 ऑगस्टच्या आंदोलनादरम्यान दंगल घडवण्याचा डाव असल्याची मला खात्री आहे. जर एका पोराला जरी धक्का लागला, तर संपूर्ण राज्य बंद करून टाकू,” असा इशारा देत त्यांनी सरकारला चेतावणी दिली. जरांगे सध्या मराठवाड्यात संवाद दौऱ्यावर असून, आज परभणीत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांनी आरोप केला की, फडणवीसांनी गोव्यातील ओबीसी मेळाव्यात नेत्यांचे कान भरले आहेत आणि मराठा समाजाला डावं करून राज्यात दंगल पेटवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे.
“मराठ्यांनी तुम्हाला सत्तेत बसवलं आणि तुम्ही ओबीसीसाठी लढणार, मग आमच्यासाठी कोण लढणार?” असा सवाल करत त्यांनी ओबीसी आणि दलित-मुस्लिम समाजाकडूनही फडणवीसांना मतदान मिळाल्याचे नमूद केले. मनोज जरांगे यांनी स्पष्ट सांगितले की, यावेळी माघार नाही, आरक्षण घेऊनच थांबू. ‘सगेसोयरे’ अध्यादेश लागू करावा आणि मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका असल्याचे त्यांनी ठणकावले.




















