जळगाव मिरर | २३ फेब्रुवारी २०२६
मेरा युवा भारत, जळगाव तर्फे भारत सरकार, युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय यांच्या मार्गदर्शनाखाली कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे दि. १८ ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आंतर जिल्हा युवा देवाण-घेवाण कार्यक्रम यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला. या पाच दिवसीय कार्यक्रमात मुंबई जिल्ह्यातील ३७ युवक-युवतींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचा उद्देश युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सांस्कृतिक समन्वय व नेतृत्वगुणांचा विकास साधणे हा होता.
कार्यक्रमादरम्यान खानदेशचा इतिहास, अहिराणी भाषा व तिचे महत्त्व, खानदेशातील खाद्यसंस्कृती, ताण-तणाव व्यवस्थापन, अमली पदार्थांविषयी जनजागृती तसेच विकसित भारत २०४७ या विषयांवर मार्गदर्शनपर सत्रे आयोजित करण्यात आली. तसेच सहभागी युवकांना सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेंजेस, अजिंठा लेणी, आश्रमशाळा, ग्रामपंचायत तसेच कृषी विज्ञान केंद्र, पाल येथे शैक्षणिक भेटी देण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती रॅलीतही युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
समारोप कार्यक्रमात सहभागी युवकांनी जळगाव जिल्ह्याच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीबद्दल समाधान व्यक्त केले. कृषी क्षेत्र, खाद्यसंस्कृती व लोककला यांविषयी प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याचे त्यांनी सांगितले. समारोप प्रसंगी श्री.व्ही.एम.रोकडे, संचालक, एनएसएस यांनी युवकांना पर्यावरण संवर्धनासोबत सांस्कृतिक जतनाचे महत्त्व पटवून दिले. श्री. जयदीप पाटील यांनी विकसित भारत २०४७ या संकल्पनेवर मार्गदर्शन करताना युवकांची भूमिका अधोरेखित केली. श्री.अभिषेक चवरे, जिल्हा युवा अधिकारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमास राजू गावरे, जिल्हा समन्वयक, एनएसएस, श्री.के.दांडे, श्री.पी.चव्हाण, एनएसएस कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते. तसेच कमलेश सोनवणे, चेतन पाटील, तुषार साळवे व मुकेश भालेराव या स्वयंसेवकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. हा आंतर जिल्हा युवा आदान-प्रदान कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला असून युवकांमध्ये “एकता व विविधता” यांची भावना अधिक दृढ झाली आहे.




















