जळगाव मिरर | १७ फेब्रुवारी २०२६
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स जळाल्याच्या दाव्यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. विमानाच्या शेपटीला अपघातात कोणतीही गंभीर हानी झाली नसताना ब्लॅक बॉक्स जळाल्याचे सांगितले जात असल्याने या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले की, विमानाचा ब्लॅक बॉक्स साधारणपणे विमानाच्या टेल (शेपटी) भागात बसवला जातो. अपघाताच्या वेळी टेल भाग तुलनेने सुरक्षित राहण्याची शक्यता अधिक असल्यानेच ही रचना केली जाते. संबंधित अपघातात विमानाची शेपटी सुस्थितीत दिसत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे ब्लॅक बॉक्सला मोठे नुकसान होण्याचा संबंधच येत नाही, असा त्यांचा दावा आहे. ब्लॅक बॉक्स हे अत्यंत उच्च तापमान, जोराचे धक्के आणि पाण्याचा दाब सहन करण्यासाठी विशेष डिझाइन केलेले असते. त्यामुळे तो सहज जळून खाक होऊ शकत नाही, असेही मिटकरी यांनी नमूद केले.
ब्लॅक बॉक्स कधी नष्ट होऊ शकतो?
मिटकरी यांनी तांत्रिक बाबी स्पष्ट करताना सांगितले की, काही अपवादात्मक परिस्थितीत ब्लॅक बॉक्सचे नुकसान होऊ शकते —
-
अत्यंत उच्च तापमान: 1,100°C पेक्षा जास्त तापमान 60 मिनिटांहून अधिक काळ टिकल्यास आतील फ्लॅश मेमरीचे नुकसान होऊ शकते.
-
अत्यंत तीव्र धक्का: सुमारे 3,400 Gs पेक्षा जास्त धक्का बसल्यास यंत्रणा पूर्णपणे नष्ट होऊ शकते.
-
पर्यावरणीय परिणाम: खोल समुद्रातील मीठ पाण्यात दीर्घकाळ राहिल्यास गंज निर्माण होऊ शकतो. मात्र, ब्लॅक बॉक्स साधारण 30 दिवस उच्च दाब सहन करण्यासाठी डिझाइन केलेला असतो.
या पार्श्वभूमीवर, संबंधित अपघातात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
वाढता संशय आणि राजकीय पडसाद
28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या अपघातानंतर अजित पवार यांच्या मृत्यूभोवती विविध शंका उपस्थित होत आहेत. ब्लॅक बॉक्समधील माहिती पुनर्प्राप्त होत नसल्याच्या चर्चेमुळे संशय अधिक गडद होत आहे. मिटकरी यांच्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला नवे राजकीय वळण मिळाले आहे. दरम्यान, अधिकृत तपास यंत्रणेकडून आंतरराष्ट्रीय निकषांनुसार सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ब्लॅक बॉक्स जळाल्याच्या दाव्यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण येण्याची शक्यता आहे. तपासाचा अंतिम अहवाल येईपर्यंत या प्रकरणातील प्रश्न कायम राहणार असल्याचे चित्र आहे.




















