
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
नगरपालिकेला तीन वर्षांसाठी आयएसओ ९००१:२०१५ मानांकन प्राप्त झाले असून आयएसओ मानांकन मिळवणारी राज्यातील पहिली नगरपालिका असल्याचा दावा अमळनेर पालिकेने केला आहे
गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन म्हणून अमळनेर पालिकेला हे मानांकन प्राप्त झाले आहे. अमळनेर नगरपालिकेने सर्व कामगारांना गणवेश, कार्यालयीन कर्मचाऱ्यांना गणवेश वेळेची शिस्त घालून सुशासन, तसेच बांधकाम, रस्ते व इतर विकासात्मक गुणवत्तापूर्ण कार्यप्रशासन राबवले. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत नियमित स्वच्छता अभियान, कामगारांची सुरक्षा, शिस्त लावली.
काटकसरीने पाणी वापर करून जलसंवर्धन आणि घनकचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण, हरित पट्टे विकसित केले. सांडपाणी व्यवस्थापन, पाण्याचा पुनर्वापर करून पर्यावरण संवर्धन तसेच ऊर्जा कार्यक्षमता, सौरऊर्जेचा वापर केला. त्यामुळेच अमळनेर नगरपालिकेला १५ रोजी आयएसओ मानांकन मिळाले आहे. तीन वर्षांसाठी हे मानांकन असून त्यादरम्यान १५ मे २०२४ ला पहिले सर्वेक्षण व १५ मे २०२५ ला दुसरे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, संजय चौधरी, अभियंता दिगंबर वाघ, डॉ. विलास महाजन यांचा खासदार शरद पवार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यापूर्वीही पालिकेने शासनाच्या विविध स्पर्धा व उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवत अव्वल स्थान प्राप्त केलेले आहे.





















