जळगाव मिरर | २६ जुलै २०२५
शहरातील विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल, जळगाव येथे २६ ते २८ जुलै २०२५ दरम्यान CBSE क्लस्टर नाइंथ कबड्डी स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या औचित्याने शाळेच्या वतीने प्रेरणादायी रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
रॅलीचे आयोजन – उत्साहात स्वागत
या रॅलीमध्ये देशभरातून आलेल्या कबड्डी खेळाडूंनी सहभाग नोंदवला. जी.एस. ग्राउंडपासून ते सागर पार्कपर्यंत ही रॅली काढण्यात आली. पारंपरिक ढोल-ताशा, घोषवाक्य आणि खेळाडूंच्या वेशभूषेने संपूर्ण वातावरण उत्साही बनवले होते.
या रॅलीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विशेष उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. उपस्थित मान्यवर: जळगाव जनता सहकारी बँक अध्यक्ष श्री. सतीश मदाने , क्षुधा शांती अध्यक्ष श्री. संजय बिर्ला, सदस्य, शालेय समिती श्री. सरल चोपडा , विवेकानंद प्रतिष्ठान व्यवस्थापकीय सदस्य श्री. कुशल गांधी, सचिव, विवेकानंद प्रतिष्ठान श्री. विनोद पाटील या मान्यवरांनी आपल्या भाषणांतून खेळांचे महत्त्व, कबड्डीचा भारतीय परंपरेतील गौरव आणि विद्यार्थ्यांमधील शारीरिक-मानसिक विकासावर भर दिला.
सीबीएसई क्लस्टर नाइंथ स्पर्धेचा थाट
या तीन दिवसीय कबड्डी स्पर्धेत राज्यभरातील विविध सीबीएसई शाळांतील मुलं आणि मुलींचे संघ सहभागी होणार आहेत. शिस्तबद्ध आयोजन, उत्कृष्ट मैदान व्यवस्था आणि खेळाडूंसाठी आवश्यक सुविधा देण्यात आलेल्या आहेत. स्पर्धेचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, संघभावना व स्पर्धात्मकतेचा विकास घडवणे. काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलचे व्यवस्थापन आणि शिक्षकवृंद यांनी या स्पर्धेचे अत्यंत शिस्तबद्ध आयोजन केले असून, शाळेतील विद्यार्थ्यांनाही यामधून खूप काही शिकायला मिळणार आहे, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
“कबड्डी हा भारताचा पारंपरिक खेळ असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने आपली ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांनी या खेळातून बोध घ्यावा आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम व्हावं, हीच आमची इच्छा आहे,” असे विचार शाळेचे प्रतिनिधी यांनी मांडले.




















