
जळगाव मिरर | ६ मार्च २०२६
जळगाव शहरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आरटीओ विभागाच्या वाहन फिटनेस टेस्टिंग ट्रॅक आणि पक्क्या लायसन्स चाचणी ट्रॅकवर नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. नागरिकांना होत असलेल्या हालअपेष्टा तातडीने थांबवाव्यात, अशी मागणी मनसेने केली आहे.
सध्या जळगाव जिल्ह्यात उन्हाचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला असून उष्णतेची लाट जाणवत आहे. अशा परिस्थितीत दररोज शेकडो वाहन चालक आणि नागरिक विविध कामांसाठी आरटीओच्या ट्रॅकवर येत असतात. मात्र या ठिकाणी पिण्याचे पाणी, सावलीसाठी शेड आणि स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनानुसार, ट्रॅकवर येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने शहरापासून दूर असलेल्या या परिसरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच वाहन चाचणीसाठी येणाऱ्या नागरिकांना कडक उन्हात तासनतास उभे राहावे लागते. सावलीत बसण्यासाठी कोणतीही वेटिंग शेड नसल्याने उष्माघाताचा धोका निर्माण होत असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.
याशिवाय महिला आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृहांची योग्य व्यवस्था नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे मनसेने सांगितले. हा परिसर शहरापासून दूर असल्याने आपत्कालीन परिस्थितीत किंवा साध्या गरजांसाठीही नागरिकांना शहरात धाव घ्यावी लागते, अशीही बाब निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे.
प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून तातडीने उपाययोजना न केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते, असा इशाराही मनसेने दिला आहे. मनसेने प्रशासनाकडे ट्रॅकवर त्वरित पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करणे, नागरिकांसाठी प्रशस्त व सावलीची शेड उभारणे तसेच तातडीने फिरते किंवा कायमस्वरूपी स्वच्छतागृह उपलब्ध करून देणे या मागण्या केल्या आहेत. या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन येत्या आठ दिवसांत आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या शैलीत तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, ललित शर्मा, खुशाल ठाकूर, युसुफ खाटीक, अश्फाक शहा, आली खाटीक यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.




















