जळगाव :प्रतिनिधी
राजस्थान मधील जालोर येथे इयत्ता तिसरीचे शिक्षण घेणाऱ्या इंद्रा मेघवाल या विद्यार्थ्याच्या हत्येचा व धरणगाव येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांचे करण्यात आलेले शुद्धीकरण या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे निदर्शने आंदोलन व घोषणाबाजी करून आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.
या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मुकुंद सपकाळे, धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंद नन्नवरे, छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष अमोल कोल्हे, संजय सपकाळे यांनी केले.
राजस्थान येथे जालोर या गावी शाळेत अनुसूचित जातीच्या दलित विद्यार्थ्याने सवर्ण शिक्षकाच्या पाण्याच्या टाकीतून पिण्यासाठी पाणी घेतले , दलित विद्यार्थ्याने पाण्याच्या टाकीला स्पर्श केला व तो अस्पृश्य आहे असे मानुन पाणी बाटले म्हणुन शिक्षकाने इंद्रा मेघवाल या विद्यार्थ्याला बेदम व जबर मारहाण केली त्यामुळेच विद्यार्थ्याचा मृत्यू झाला . या घटनेचा आंदोलकांनी तीव्र निषेध व्यक्त करत , त्या मारेकरी शिक्षकास फाशीची शिक्षा करा अशी मागणी महामहिम राष्ट्रपती महोदया यांना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यामार्फत निवेदन देऊन केली .
तसेच मा. ना. गुलाबराव पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना वंदन करून पुष्पहार अर्पण केला व स्पर्श केला म्हणून शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख गुलाबराव वाघ आणि धरणगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी पुरोहितांकडून पूजाविधी करत मंत्रोच्चारण करून दोन्ही पुतळ्यांचा दुग्धाभिषेक करून , दोन्ही पुतळ्यांवर गोमूत्र शिंपडले व शुद्धीकरण केले . सदर कृती अतिशय निंदाजनक असुन अंधश्रद्धा व अस्पृश्यता पसरवणारी आहे . ही घटना अंधश्रद्धा विरोधी व अस्पृश्यता विरोधी कायद्याचे उल्लंघन व भंग करणारी घटना आहे , म्हणुन संबंधित इसमांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी देखील आंदोलकांकडून करण्यात आली .
सदर आंदोलनात नगरसेवक सुरेश सोनवणे, रमेश सोनवणे, चंदन बिऱ्हाडे, महेंद्र केदारे, सुरेश तायडे, साहेबराव वानखेडे, दिलीप सपकाळे, भारत सोनवणे, वाल्मीक सपकाळे, आनंदा तायडे, दादाराव शिरसाठ, प्रणय नन्नवरे, प्रा. प्रीतीलाल पवार, उमेश गाढे, विवेक जावळे, ऍड . राजेश गोयर, यशवंत घोडेस्वार, मिलिंद सोनवणे, चंद्रकांत नन्नवरे, बाबुराव वाघ, युवराज सुरवाडे, गुलाब कांबळे, सुभाष साळुंखे, आबा महाजन, अनिल माळी, लखन पाटील, यश भालेराव, आनंद इंगळे, पंकज नन्नवरे, विलास नन्नवरे, सुभाष नन्नवरे, कल्पेश कोळी, समाधान वाघ, मिलिंद नन्नवरे, प्रकाश मोरे, बंटी नन्नवरे, नाना ठाकरे, भिमराव सोनवणे, रवींद्र सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.