जळगाव मिरर | ११ डिसेंबर २०२५
महाराष्ट्रात आगामी निवडणुकांची चाहूल लागली असताना भाजपकडून महत्त्वाची हालचाल करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिल्लीमध्ये मध्यरात्री उशिरापर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. निवडणूक पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून राज्यातील राजकीय समीकरणांबाबत उच्चस्तरीय पातळीवर रणनीती ठरवण्याच्या दृष्टीने हा संवाद महत्त्वाचा मानला जात आहे.
या बैठकीत राज्यातील राजकीय वातावरण, जिल्हानिहाय स्थिती, आगामी निवडणुकांतील आव्हाने, प्रचारयोजना आणि भाजप–शिंदे गटामधील समन्वय याबाबत विस्तृत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवाय राज्यातील काही महत्त्वाच्या जिल्ह्यांत पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी विशेष मोहिमा राबवण्याबाबतही शहा यांनी काही दिशा दिल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, याच दिवशी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात निवडणूक तयारीवर महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. या बैठकीतील निष्कर्ष आणि प्राथमिक रणनीती चव्हाण यांनी दिल्लीमध्ये शहांना सादर केल्याचे सूत्रांकडून समजते.
राज्यातील सत्तास्थिती, विरोधकांची रणनीती, तिन्ही पक्षांची ताकद आणि जनतेचा कल या सर्व मुद्द्यांचा शहांशी झालेल्या चर्चेत सखोल आढावा घेण्यात आल्याचे सांगितले जाते. मध्यरात्री झालेली ही बैठक राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. येत्या काही दिवसांत भाजपच्या निवडणूक रोडमॅपबाबत केंद्रीय नेतृत्वाकडून महत्त्वाच्या सूचना मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.





















