
जळगाव मिरर | २३ मे २०२५
राज्यातील महायुती सरकारमधील धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्री पदाची संधी मिळाली आहे. सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महायुती सरकारमध्ये ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा समावेश झालेला आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर ते मुंबईहून नाशिककडे निघाले होते. त्यावेळी त्यांनी शहापूर येथे ओबीसी कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी मला मंत्रिमंडळात घेतले आहे. खरे म्हणजे मागील चार महिन्यांपूर्वीच मला मंत्रिमंडळात घ्यायला हवे होते, अशी आहे.
छगन भुजबळ म्हणाले, मंत्रिमंडळात मला घेतले आहे. खरे म्हणजे मागील चार महिन्यांपूर्वीच मला मंत्रिमंडळात घ्यायला हवे होते, परंतु ठीक आहे. त्यावेळी कदाचित जागा शिल्लक नसेल. यावेळी पक्षाने आणि मुख्यमंत्र्यांनी ठरवले म्हणून पुन्हा संधी मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
पुढे बोलताना म्हणाले, मी गेल्या ३८ वर्षांपासून ओबीसींचे काम करीत आहे. मंत्री असलो काय अथवा नसलो काय ते करीतच राहणार. जातगणनेची मागणी आम्ही २० वर्षांपासून करीत आहोत. यासाठी कोर्टात देखील गेलो होतो, असे भुजबळ यावेळी म्हणाले.
तसेच, दलित आणि आदिवासींना ज्याप्रमाणे केंद्र सरकारकडून निधी दिला जातो त्याप्रमाणे तो ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना देखील मिळाला पाहिजे, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. यावेळी जमलेल्या ओबीसी कार्यकर्त्यांनी मंत्रिमंडळातल्या समावेशाबद्दल मंत्री छगन भुजबळ यांना शुभेच्छा दिल्या.




















