जळगाव मिरर | १५ फेब्रुवारी २०२६
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला लाच घेताना रंगेहात पकडल्याच्या प्रकरणानंतर निर्माण झालेल्या राजकीय वादळात उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा अजित पवार यांनी झिरवाळ यांच्या पाठिशी उभे राहण्याचे संकेत दिले आहेत. या प्रकरणी सविस्तर चर्चा करण्यासाठी त्यांनी सोमवारी सायंकाळी पक्षाच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत झिरवाळ प्रकरणासह पक्षाच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला एसीबीने ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. या घटनेनंतर विरोधकांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली असून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर झिरवाळ अडचणीत आले आहेत. शनिवारी सकाळपासून ते संपर्काबाहेर असल्याची चर्चा रंगली होती, त्यामुळे राजकीय दबाव वाढल्याचे चित्र होते.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी सोमवारी सायंकाळी ६ वाजता कोअर कमिटीची बैठक बोलावून या प्रकरणातील घडामोडींचा आढावा घेण्याचे ठरवले आहे. या बैठकीत झिरवाळ प्रकरणात नेमके काय घडले, पुढे कोणती भूमिका घ्यायची, तसेच पक्षाच्या प्रतिमेवर झालेल्या परिणामाबाबत चर्चा होणार आहे. याचबरोबर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेण्याबाबतही चर्चा अपेक्षित आहे. पुढील १५ दिवसांत संबंधित प्रक्रियेला प्रारंभ होऊ शकतो, असा अंदाज आहे.
उल्लेखनीय म्हणजे, या प्रकरणात आमदार अमोल मिटकरी यांच्याव्यतिरिक्त पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांनी उघडपणे झिरवाळ यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे पक्ष बचावात्मक भूमिकेत गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या परिस्थितीत पक्षाला सावरण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेतल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, झिरवाळ यांनी या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले आहे की, संबंधित लिपिकाचा या प्रकरणाशी स्वतःचा काहीही संबंध नसून चौकशीत आपला संबंध आढळल्यास आपण तत्काळ राजीनामा देऊ. “एसीबीने त्याला रंगेहात पकडले आहे. त्याला शिक्षा भोगावीच लागेल. माझ्याशी संबंध सिद्ध झाल्यास मी जबाबदारी स्वीकारेन,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेससमोर राजकीय आव्हान उभे राहिले असून कोअर कमिटीच्या बैठकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




















