
जळगाव मिरर | २६ ऑगस्ट २०२५
राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याविरोधात आता अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले. पण त्यांच्याच परिवारावर एकेरी भाषेत टीका करता. सरकार उलथावून टाकण्याची भाषा करता. आमचे सरकार लुळेपांगळे नाही. अरेरावीची भाषा बंद करा, असा इशारा सरकारने या प्रकरणी जरांगे यांना दिला आहे.
मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे यांना मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई केली आहे. कोर्टाने या प्रकरणी त्यांना खारघर किंवा नवी मुंबईत एखाद्या ठिकाणी उपोषणाला बसण्याची सूचना केली आहे. जरांगे उद्या सकाळी 10 वा. मुंबईच्या दिशेने निघणार असताना कोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे सरकारने जरांगेंविरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या प्रकरणी आपला संतप्त सूर आळवत म्हणाले, मनोज जरांगे पाटील सरकार उलथवून टाकण्याची भाषा करत आहेत. हे पूर्णतः अयोग्य आहे. कारण, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार अतिशय मजबूत आहे. हे सरकार जनतेने 3 कोटी 17 लाख मतांनी निवडून दिले आहे. 51.78 टक्के मते घेऊन हे सरकार आले आहे. त्यानंतरही हे सरकार उलथावून टाकू अशी भाषा करणे हे महाराष्ट्राला चीड आणणारे आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की, कुणीही चिथावणीखोर भाषा करू नये. कुणीही कुणाला चिथावणी देऊ नये.
ते पुढे म्हणाले, सर्वांना आपापले म्हणणे मांडता येईल. राहिला प्रश्न मराठा आरक्षणाचा, तर मराठा आरक्षण या राज्यात आणण्याचेच काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यांनी स्वतः मराठा समाजाचे आर्थिक, सामाजिक सर्वेक्षण करण्याचे काम केले आहे. 2014 ते 2019 या काळात फडणवीसांनी स्वतः 7-8 रात्री जागरण करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा तयार केला होता. तो विधिमंडळात, हायकोर्टात टिकला. सुप्रीम कोर्टातही टिकला. पण उद्धव ठाकरे सरकार आल्यानंतर हा कायदा सुप्रीम कोर्टाने निरस्त केला.
ज्यांनी मराठा समाजाला आपले संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली. मराठा आरक्षण दिले. अशा माणसाला एकेरी भाषेत बोलणे, त्याच्या परिवाराबद्दल, आमच्या आई-बहिणींबद्दल अशा पद्धतीने बोलणे आम्ही व हा महाराष्ट्रही सहन करणार नाही. तुम्ही कुणाचे सरकार उलथवण्याची भाषा करता? 3 कोटी 17 लाख लोकांनी महायुतीला मतदान केले आहे. 51. 78 कोटी मते आम्हाला मिळाली आहेत. असे सरकार तुम्ही उलथवण्याची भाषा करता? खऱ्या अर्थाने ही भाषा बंद झाली पाहिजे. आंदोलन करायचे तर करा. मागण्या करायच्या तर करा. पण आमचे सरकार उलथवून टाकण्याची भाषा करणे, एकेरी भाषेत बोलणे, आमच्या आयाबहिणींशी बोलणे हे कुणीही खपवून घेणार नाही, असे बावनकुळे म्हणाले.




















