
जळगाव मिरर | ११ एप्रिल २०२६
जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनोने गावात चांदीचे दागिने पॉलीश करून देण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक करणाऱ्या परराज्यातील तिघा भामट्यांना शेवगेपिंप्री येथे एका तरुणाच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी जेरबंद केले.
९ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास जुनोने येथील कविता ताराचंद राठोड यांच्या घरी दुचाकीवरून तिघे अनोळखी इसम आले. आम्ही सोनार असून चांदीचे दागिने पॉलीश करून देतो, असे सांगून त्यांनी महिलेचा विश्वास संपादन केला. “तुम्ही आमच्या बहिणीसारख्या आहात,” अशी गोड बोलणी करत त्यांनी त्यांच्या हातातील सुमारे ४०० ग्रॅम वजनाचे चांदीचे बाजूबंद घेतले.
भामट्यांनी दागिने एका बादलीत टाकून त्यात केमिकल टाकल्याचे नाटक केले आणि नंतर ते स्वच्छ करून परत दिले. मात्र, संशय आल्याने महिलेने देऊळगाव गुजरी येथे जाऊन दागिन्यांचे वजन तपासले असता सुमारे ६० ग्रॅमची तफावत आढळून आली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, आरोपी शेवगेपिंप्री येथेही अशाच प्रकारे लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी दिनेश रमेश राठोड या तरुणाला त्यांच्यावर संशय आला. त्याने तातडीने फत्तेपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अंकुश जाधव यांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत हे.कॉ. गनी तडवी, पो.ना. मुकेश पाटील व चालक पो.कॉ. दिलीप पाटील यांना घटनास्थळी पाठवले. त्यांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत ते बिहार राज्यातील रोहितकुमार मदन सहा, रोशनकुमार बबलू सहा व बलरामकुमार सिकंदर सहा (रा. पचगचिया, जि. भागलपूर) येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी कविता राठोड यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडील दुचाकी जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास हे.कॉ. प्रवीण चौधरी करीत आहेत. दरम्यान, गावात दागिने पॉलीश करून देण्याच्या बहाण्याने फिरणाऱ्या अनोळखी व्यक्तींविषयी सतर्क राहावे व संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन स.पो.नि. अंकुश जाधव यांनी केले आहे.





















