जळगाव मिरर | २० सप्टेंबर २०२६
नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा देशातून परतीचा प्रवास शनिवारी पश्चिम राजस्थानमधून सुरू झाला. यंदा तो दोन दिवस उशिराने परतत असून, 3-4 दिवसांत पंजाब व गुजरातच्या काही भागांतून माघार घेईल. दुसरीकडे, अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

अंदमानमधील हवामान प्रणाली 23 सप्टेंबरपर्यंत तीव्र होऊन ओडिशा-आंध्र किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे दक्षिण भारत व पूर्व किनारपट्टीवर 25 सप्टेंबरपर्यंत पाऊस राहील. ओडिशा आणि आंध्र किनारपट्टीला 21 ते 24 सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’, तर केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, बंगालसह ईशान्येकडील राज्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही रविवारी सर्वत्र वादळी वाऱ्यांसह पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने सप्टेंबर महिन्यात तापमानाने उच्चांक गाठला आहे. जिल्ह्यात 19 सप्टेंबरपर्यंत सरासरी 526.6 मिमी पावसाची अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्षात केवळ 422.0 मिमी (80.2 टक्के) पावसाची नोंद झाली आहे. जून ते ऑगस्टदरम्यान 90.8 टक्के पाऊस झाला; परंतु सप्टेंबरमध्ये पावसाने ओढ दिल्याने वातावरणातील आर्द्रता घटून उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. वाढत्या उकाड्यामुळे सलग सहाव्या दिवशी शहराचे कमाल तापमान 30 अंशांच्या पुढे राहिले.
“वाढत्या एल निनोच्या प्रभावामुळे वातावरणात हे मोठे बदल दिसत आहेत. नेहमी हमखास परतीचा पाऊस मिळणाऱ्या मराठवाड्यात यंदा तुलनेत पाऊस कमी राहील तसेच आगामी मोसमात थंडीचा कडाकाही कमीच असण्याची शक्यता आहे. – श्रीनिवास औंधकर, (संचालक, एमजीएम विज्ञान केंद्र)
जालना जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दिलेली उघडीप आता संपण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सोमवार ते शुक्रवार या कालावधीत जिल्ह्यात पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार सरी होण्याचा अंदाज आहे. या कालावधीत बहुतांश वेळ ढगाळ वातावरण राहणार असून, कमाल तापमानातही घट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात मागील आठवड्यात दोन वेळा तुरळक पाऊस झाला. मात्र, त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. त्यामुळे दीर्घकाळापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आता पुढील पाच दिवसांच्या हवामानाकडे लागल्या आहेत. सध्या जिल्ह्यात कमाल तापमान 32.7 अंश सेल्सियसच्या आसपास आहे.
वातावरणात सध्या उकाडा वाढतो आहे शिवाय आर्द्रता घटते आहे. पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार होत आहे. पुढील दोन तीन दिवसात पाऊस होईल असा अंदाज आहे. यात आगामी चार पाच दिवस महत्वाचे आहेत. शिवाय त्यानंतर सप्टेंबर अखेरीस परतीच्या पावसाच्याही अपेक्षा आहेत.परतीचा पाऊस होईल असा अंदाज आहे.खरीपाच्या दृष्टीने हा पाऊस महत्वाचा असणार आहे. – प्रा. पंडित वासरे, हवामान अभ्यासक हवामान विभागाने यलो अलर्ट दिल्यानंतर शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास जुळे सोलापूर, विजापूर रोड ते सात रस्ता या परिसरात हलक्या सरी कोसळल्या. उर्वरित भागात पाऊस नव्हता. परंतु पावसाची चिन्हे दिसून आली. गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाची प्रतीक्षा होती.





















