
जळगाव मिरर | १८ जून २०२५
गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठी- हिंदी भाषेचा वाद सुरु असतांना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य सरकारच्या हिंदी भाषा धोरणावर जोरदार टीका केली. शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीने शिकवण्याच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
या वेळी राज ठाकरे म्हणाले की, आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी सक्तीने शिकवणे हा मराठी भाषेच्या अस्मितेला धक्का आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर हिंदी लादण्याचा प्रयत्न केला तर मनसे तीव्र आंदोलन छेडेल. मराठी भाषा सर्व शाळांमध्ये बंधनकारक असली पाहिजे. शासनाने याबाबत स्पष्ट आणि लेखी आदेश काढावा, अशी मागणीही त्यांनी केली.
“सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची केली आहे. हे आम्ही कदापिही मान्य करणार नाही. मी १७ एप्रिललाच याविरोधात पत्र दिले होते. दुसऱ्या प्रांतातली भाषा इथे का शिकवली जात आहे, हा प्रश्न आम्ही सरकारपुढे मांडतोय. हिंदीच्या नावावर ‘राजकीय पोळी भाजण्याचा’ हा प्रकार असल्याचा आराेप करत हिंदी सक्ती महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला आहे. हिंदीची सक्ती दक्षिणेत दाखवा, महाराष्ट्रात नाही. आम्ही हे शाळांमध्ये होऊ देणार नाही. याला आत्ताच रोखले नाही तर भविष्यात मराठी अस्तित्व संकटात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
हिंदी भाषेची सक्ती नाही, अशी घोषणा केली होती; मग शाळांमध्ये हिंदी पुस्तके कशी पोहोचली? यासंदर्भातील शासकीय आदेश कुठे आहे? लेखी आदेश का नाही?आपल्या भाषेची अस्मिता कधी जपणार?”, असा सवालही राज ठाकरे यांनी केला. तसेच याप्रश्नी त्यांनी शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठवलेल्या पत्रात लिहिले आहे की, “हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. राज्यभाषा मराठी आहे आणि ती आपण मरू द्यायची नाही. सरकारवर विश्वास ठेऊ नका. तुम्ही आमच्या सोबत आहात. कोणताही दबाव येऊ दिला नाही पाहिजे. हे महाराष्ट्रावर कब्जा मिळवण्याचे राजकारण आहे.” “
गुजरातमध्ये हिंदी सक्ती नाही, मग महाराष्ट्रात का? हिंदी भाषा सुंदर आहे, पण ती राष्ट्रीय भाषा नाही. कोणी हवं असल्यास पुढे कॉलेजमध्ये घेईलच, पण पहिलीपासून शिकवण्याची गरज काय? ही सगळी IAS लॉबीसाठी तयारी आहे, असा आराेपही त्यांनी केला.