जळगाव मिरर | ८ डिसेंबर २०२५
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसचे वरिष्ठ नेते व आमदार नाना पटोले यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. महागाई, बेरोजगारी आणि रुपयाच्या घसरणीसारख्या गंभीर मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी सरकार मुद्दाम धार्मिक वाद निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
विधान भवन परिसरात माध्यमांशी बोलताना पटोले यांनी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे बाबरी मशिदीच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या मशिदीच्या पायाभरणीप्रकरणी निलंबित तृणमूल आमदार तसेच कोलकाता येथे झालेल्या मेगा भगवद्गीता पठणाविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना प्रतिक्रिया दिली.
पटोले म्हणाले, “महागाई सतत वाढत आहे, रुपयाचे मूल्य सातत्याने घसरत आहे. सरकारला या प्रश्नांची चिंता नाही. लोकांमधील नाराजीपासून पळ काढण्यासाठी धार्मिक वादाला खतपाणी घातले जात आहे.”
गेल्या १२ वर्षांपासून देशाची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती ढासळत चालली असून सरकार मुद्देसूद समस्यांवरून जनतेचे लक्ष जाणीवपूर्वक हटवत असल्याचा दावा पटोले यांनी केला.





















