
जळगाव मिरर | २५ एप्रिल २०२५
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ निष्पाप हिंदू भारतीयांची हत्या करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील सहा लोकांचा समावेश होता. तसेच, या घटनेनंतर महाराष्ट्रातील अनेक पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांना राज्यात परत आणण्यासाठी विशेष विमानाची सोय करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना शिंदे गटाची एक टीमही तिथे पोहोचली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही काश्मीरमध्ये गेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली आहे. परंतु, याच्या बढाया शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी मारल्या आहेत. जे लोक कधीच विमानात बसले नाहीत, त्यांना एकनाथ शिंदे यांनी विमानात बसवून आणले, असं वादग्रस्त विधान नरेश म्हस्के यांनी केलं आहे. त्यांच्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यावर शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी सडेतोड उत्तर दिल आहे.
रोहिणी खडसे म्हणाल्या, दहशतवादी हल्ल्यासारख्या गंभीर विषयात महाराष्ट्रात दुर्दैवाने श्रेयवादाची लढाई सुरू आहे. सध्याची वेळ ही सगळ्यांनी एकत्र येऊन या परिस्थितीला सामोरे जाण्याची आहे. पण खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. ही उपकाराची भाषा महाराष्ट्रातली जनता खपवून घेणार नाही. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावर बसवून महाराष्ट्रातील जनतेने उपकार केले आहेत, असा हल्लाबोल रोहिणी खडसे यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना म्हस्के म्हणाले, ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आमचे पथक काश्मीरला पाठवले. एकनाथ शिंदे स्वतः त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. कोल्हापूर, केरळ, इशाळवाडी या ठिकाणी एकनाथ शिंदे सर्वात आधी पोहोचून मदत करत होते. सरकार तर मदत करत आहे. जे लोक कधीही विमानात बसले नव्हते त्या लोकांना एकनाथ शिंदे यांनी विमानात बसवून आणले आहे.





















