जळगाव मिरर | २६ जून २०२५
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) पथकांनी दि.२५ जून रोजी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या वेगवान कारवाईत तीन संशयित चोरांना अटक केली असून, एका बेपत्ता अल्पवयीन मुलाला सुखरूपपणे त्याच्या कुटुंबाकडे सोपविण्यात आले आहे. या कारवाईत आरपीएफने दक्षता, तत्परता आणि माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, २४ जून रोजी सकाळी, भुसावळ रेल्वे स्थानकावर गस्त घालत असताना सीपीडीएस पथकातील हेड कॉन्स्टेबल महेंद्र कुशवाह, कॉन्स्टेबल नितेश कुशवाह आणि सीआयबी बीएसएलचे कपिल सांगवान यांना प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर एक संशयास्पद व्यक्ती फिरताना दिसली. चौकशी दरम्यान तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही, म्हणून त्याला आरपीएफ स्टेशनमध्ये आणण्यात आले. अधिक चौकशीअंती, त्याने आपले नाव शंभू नथु गोस्वामी (३०, रा. दर्यापूर, जि. बुरहानपूर) असे सांगितले. त्याने चोरीच्या उद्देशाने स्टेशनमध्ये आल्याचे कबूल केले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाईसाठी त्याला जीआरपीकडे सोपवण्यात आले.
या कारवाईसोबतच आरपीएफच्या पथकाने एक बेपत्ता अल्पवयीन मुलगा शोधून त्याला सुखरूपपणे त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले. ही बाब नागरिकांच्या सुरक्षेबरोबरच आरपीएफच्या सामाजिक भानाचेही उदाहरण ठरली आहे. या साऱ्या घटनांमध्ये आरपीएफच्या दक्षतेमुळे गंभीर गुन्हे टळले असून, नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. गुन्हेगारांना अटक करतानाच, हरवलेल्या मुलाला शोधून त्याच्या कुटुंबाशी पुन्हा जोडल्याने आरपीएफच्या संवेदनशीलतेचेही दर्शन घडते.
