जळगाव मिरर | २६ जुलै २०२५
भुसावळ तालुक्यातील वांजोळा येथील २७वर्षीय महिला दिपाली चेतन तायडे यांचा शुक्रवारी (२५ जुलै) सकाळी साडेपाचच्या सुमारास विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. घराजवळ पाण्याची मोटर लावण्यासाठी गेलेल्या दिपाली यांना अचानक विजेचा धक्का बसला आणि त्या बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर कोसळल्या.
सविस्तर वृत्त असे कि, घटनेनंतर तात्काळ त्यांना भुसावळ येथील गोल्डन अवर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टर डॉ. साहू यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. यानंतर मृतदेह ट्रॉमा केअर सेंटरमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दरम्यान, दिपालीच्या मृत्यूबाबत तिच्या आई-वडिलांनी संशय व्यक्त करत तिचा घातपात झाल्याचा आरोप केला आणि मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, उपनिरीक्षक पूजा अंधारे तसेच पोलीस कर्मचारी वाल्मीक सोनवणे, जगदीश भोई, संदीप बडगे यांनी त्वरित हस्तक्षेप करून जमावाला शांत केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला, मात्र त्यांनी तो वांजोळा येथे नेण्यास नकार देत भादली येथे नेण्याचा आग्रह धरला. त्यामुळे मृतदेह दोन ते अडीच तास ट्रॉमा केअर सेंटरमध्येच पडून राहिला. अखेरीस मृतदेह भादली येथे नेण्यात आला.
या दुर्दैवी प्रसंगी गावातील सरपंचपती गोपाळ पाटील, उपसरपंच देविदास सावळे, पोलीस पाटील संतोष कोळी, तसेच पत्रकार किशोर सावळे यांनी समन्वय साधून पोलीस प्रशासनास सहकार्य केले. दिपाली हिच्या पश्चात पती व एका लहान मुलीचा परिवार आहे. या घटनेमुळे वांजोळा व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





















