
जळगाव मिरर | ६ जून २०२५
एरंडोल शहरातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सासरच्या मंडळीकडून चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे होणाऱ्या छळाला कंटाळून येथे जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेच्या परिसरात राहणाऱ्या मनिषा सागर सोनार (वय ३४) या विवाहित महिलेने घराच्या वरच्या मजल्यावर सिलींगच्या कडीला अडकवलेल्या दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपल्याची घटना ४ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला मृत महिलेचे भाऊ मनोज माधवराव पोतदार यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे कि, मनिषा हीचा सागर पल्लीवाळ (सोनार) यांच्याशी २०१४ मध्ये विवाह झाला. त्यांना शर्विल नावाचा ९ वर्षांचा मुलगा आहे. सागर पल्लीवाळ हा पुणे येथे नोकरीस असून तो पुण्यातच राहतो. मात्र मनिषा ही मुलासोबत एरंडोल येथे सासरी राहत होती. तिचा पती सागर हा अधुनमधून एरंडोल येथे येत जात होता. तिचे पती सागर पल्लीवाळ, सासू मंगला पल्लीवाळ, जेठ गणेश पल्लीवाळ, जेठाणी सुषमा पल्लीवाळ हे मनिषा हीचेवर संशय घेऊन तिचा छळ करीत असत. ५ जून २०२५ रोजी मनिषाचे मामसासरे किशोर मुंडके यांनी शिरपूर येथे घरी येऊन मनिषाने दोरीने गळफास घेतल्याचे सांगितले.
त्यामुळे माहेरची मंडळी एरंडोल येथे आली असता त्यांना ग्रामीण रूग्णालय एरंडोल येथे मनिषाच्या मृतदेहावर, गळ्यावर लाल रंगाचे वळ पडलेले दिसले. त्यामुळे मनिषा हीने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. अशी फिर्याद एरंडोल पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. याप्रकरणी सागर शामकांत पल्लीवाळ व गणेश शामकांत पल्लीवाळ या दोन्ही आरोपीतांना एरंडोल पोलीसांनी अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.




















