
मुंबई : प्रतिनिधी
”बंडाच्यावेळी जर दगाफटका झाला असता तर शहीद होण्याचीच वेळ होती” असे मोठे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते सातारा दौऱ्यावर असताना तापोळा या गावी आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले, “सर्वांनाच माहिती आहे की, आमची लढाई सोपी नव्हती. एकीकडे सत्ता, बडे नेते होते. दुसरीकडे आम्ही होता. सर्वांनाच वाटले होते की, काय होणार? जर यात थोडा जरी दगाफटका झाला असता तर शहीद होण्याचीच वेळ होती.”
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर 20 जुलैला एकनाथ शिंदे यांनी बंड करीत निवडक आमदारांना घेत सुरत गाठले. त्यानंतर सुरतमार्गे हे गुवाहटीला गेले. राज्यातून एकामागून एक आमदार शिंदे यांच्या गटात सामिल झाला. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात बंड यशस्वी झाले. त्याचीच परिणिती म्हणून राज्यात शिंदे- भाजप सरकार स्थापन झाले. हा सर्व घटनाक्रम महाराष्ट्राने पाहिला त्यामुळे सर्वांनाच बंडादरम्यान पुढे काय होणार याची उत्सुकता होती. पण त्यावेळीची स्थिती किती खडतर होती हे एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमात सांगितली.
दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर मुंबई महापालिकेच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या, ”आता शिंदे खळबळजनक विधाने करीत आहे. ते भयानक आरोप करीत आहेत. याची उत्तरे देण्याची गरज वाटत नाही, उत्तरही देणार नाही पण एकच सांगते की, ते ज्या पद्धतीने बोलत आहेत त्यापद्धतीने शिवसेना कधीच कुणाशी वागली नाही.”




















