
जळगाव मिरर | २२ मे २०२५
राज्यातील पुणे येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकरणी वैष्णवीची सासू, नवरा आणि नणंद यांना अटक करण्यात आली आहे. तर सासरे राजेंद्र हगवणे व दीर अद्यापही फरार असून त्यांना शोधण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. हगवणे यांच्या मोठ्या सुनेने देखील हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. पती घरी नसताना दीर, सासू, सासरा आणि नणंद या चौघांकडून बेदम मारहाण केल्याचा आरोप मयूरी जगताप यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना मयूरी जगताप म्हणाल्या, पती घरी नसताना पण दीर, सासू, सासरा आणि नणंद या चौघांकडून बेदम मारहाण केली जात होती. आज मी जिवंत आहे ती केवळ पतीमुळे जिवंत आहे, त्यांनीच माहेरी आणून सोडल्याने मी जिवंत राहिले. हगवणे कुटुंबातील लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात याची जाणीव त्यांना सुद्धा होती. सासरा, सासू नणंद आणि दीरांकडून भयंकर पद्धतीने माझ्यासह वैष्णवीला सुद्धा त्रास दिला जात होता, असा गंभीर आरोप हगवणे यांच्या मोठ्या सून मयूरी जगताप यांनी केला आहे.
पुढे बोलताना मयूरी जगताप म्हणाल्या, या सर्व वादाच्या मुळाशी नणंद करिष्मा आहे. पतीपासून वेगळे करण्याचा प्रयत्न कुटुंबीयांकडून झाल्याचेही मयूरी यांनी सांगितले. तसेच वैष्णवीला घरात मारहाण केली जात होती हे कर्मचाऱ्यांकडून समजले. सासरे, दीर, नणंद, सासूकडून मारहाण केली जायची. या प्रकरणाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. माझा मोबाईल माझ्याकडून शशांकने काढून घेतला व जमिनीवर आपटला. वैष्णवी सासरच्या लोकांना घाबरत होती. तसेच हगवणे कुटुंबांकडून माझ्या नवऱ्याला सुद्धा त्रास दिला जात होता.
मयूरी जगताप म्हणाल्या, घरात नेहमीच दीर, सासू, नणंदेकडून टॉर्चर केले जात होते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर सुद्धा आमच्याशी वाद घातला जात होता. इतकेच नव्हे तर चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्नही झाला. सासऱ्यांकडे बघते, दीराकडे बघते असे म्हणत वैष्णवीला त्रास दिला जायचा. घरातल्या त्रासापासून आम्ही बाहेर पडलो. मला माझ्या नवऱ्याने माहेरी आणून सोडले म्हणून मी माहेरी राहत आहे, असेही मयूरी जगताप यांनी सांगितले आहे.
आम्हाला वैष्णवीशी बोलू दिले जात नव्हते. आमच्यावरही संशय घेतला जात होता. वैष्णवीला बाळ झाले तेव्हा आम्हाला बघायलाही जाऊ दिले नाही. आम्हाला असे सांगितले की वैष्णवीच्या वडिलांनीच तुम्हाला भेटायला येऊ नका असे सांगितले आहे. आम्ही याची विचारपूस केली तेव्हा वैष्णवीचे वडील म्हणाले की जशी आम्हाला वैष्णवी आहे तशीच मयूरी आहे. आम्हाला खोटे सांगून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, असेही मयूरी जगताप यांनी सांगितले.