जळगाव मिरर | ३० जून २०२५
राज्यात मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या बाबतीत तडजोड होणार नाही, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षांना सुनावले आहे. यानंतर सरकार अशा उद्योगात पडणार नाही, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. इतकेच नाही तर आता अधिवेशनात या विषयावर वेळ वाया घालवू नका, असा सल्ला देखील त्यांनी विरोधी पक्षातील आमदारांना दिला आहे. राज्यातील इतर प्रश्नांवर विरोधकांनी आवाज उठवा, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.
हिंदीची सक्ती करणारा आदेश रद्द झाल्यानंतर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. त्यानंतर राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या वेळी राज ठाकरे म्हणले की, अधिवेशनात विरोधी पक्षाच्या आमदारांनी या विषयावर चर्चा करून वेळ वाया घालवू नये. महाराष्ट्रात अनेक प्रश्न तुंबलेले आहेत. त्यामुळे त्या प्रश्नावर बोलावे. शिक्षणामध्ये अनेक त्रुटी आहेत, शाळा नाही, शिक्षकांना पगार नाहीत, एकेका शिक्षकावर वर्क लोड टाकला जात आहे, इतरही कामे देखील शिक्षकांना दिले जात आहेत. इतके विषय आहेत, त्या विषयावर विरोधकांनी हात घालावा, असा सल्ला देखील राज ठाकरे यांनी दिला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, काल महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही आदेश रद्द केले किंवा त्यांना रद्द करायला भाग पाडले. त्याबद्दल तमाम महाराष्ट्रातल्या मराठी जनतेचे मी अभिनंदन करतो. सर्व बाजूंनी रेटा आला आणि त्यातूनच सरकारला हे करावे लागले. वास्तविक काहीही गरज नसताना हा विषय समोर आला होता. महाराष्ट्रातील साहित्यिक, काही कलावंत त्याचबरोबर मराठी वर्तमानपत्राचे संपादक यांचे देखील आभार मानत असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
वास्तविक हा विषय क्रेडिटचा नाही. मात्र, सरकारकडून आदेश निघाला, त्याचवेळी सर्वप्रथम आम्ही त्याला विरोध केला. त्या संदर्भात मी लिहिलेली तिन्ही पत्र मागील पत्रकार परिषद देखील वाचून दाखवली. राज्यातील राजकीय पक्ष देखील जसे उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतरही राजकीय पक्ष आणि महाराष्ट्रातील संघटना यांनी देखील या मोर्चाला पाठिंबा दिला होता. पाच तारखेला आम्ही मोर्चा काढणार होतो. हा जर मोर्चा निघाला असता तर अभूतपूर्व असा असता. साधारणपणे 70 – 75 वर्षातील लोकांना या मोर्चा मुळे संयुक्त महाराष्ट्राचा काळ आठवला असता. त्याच प्रकारचे वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले होते. मराठी ताकद काय आहे? मराठी भाषेच्या वाटेला गेले तर काय होते? हे देखील राज्यकर्त्यांना कळाले असेल. त्यामुळे परत ते असल्या भानगडीमध्ये जाणार नाही. अशी मी आशा – अपेक्षा बाळगतो, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
अध्यादेश रद्द झाल्यानंतर संजय राऊत यांचा फोन आला होता. त्यांनी पाच तारखेला मेळावा घेण्याचे सांगितले आहे. मात्र अद्याप ठिकाण वगैरे जाहीर करू नका, असे मी त्यांना सांगितले आहे. माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याविषयी निर्णय घेण्यात येईल. हा मेळावा झाला तरी देखील त्याला पक्षाचे लेबल नसेल. या विषयाला सर्वांनी पक्षाच्या पुढे जाऊन पाहिले पाहिजे. त्यामुळे विजयी मेळाव्याचे अद्याप ठिकाणी ठरलेले नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. मोर्चाला पक्षाचे लेबल लावू नका, असे मी म्हणाला होतो. त्यामुळे विजयी मेळावा झाला तरी त्याला पक्षाचे लेबल लावू नका. युती होतील, तुटतील मात्र मराठी भाषा एकदा तुटली तर ती परत येणार नाही. मराठी भाषेच्या माध्यमातून संस्कृती टिकून आहे. ती जर गेली, युती-आघाड्यांना काय अर्थ? असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला. निवडणुका आल्यानंतर त्या गोष्टीचा विचार करू. मात्र आता सध्या या सर्व गोष्टीकडे संकट म्हणून पहावे, त्याला राजकीय लेबल लावू नये, असे आवाहन राज यांनी केला.
