जळगाव मिरर | २० जून २०२४
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील उपोषण सुरु होते. त्यानंतर आता यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. नुकतेच मराठा आणि ओबीसी आरक्षणावर केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेणं चालणार नाही असे विधान शरद पवार यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कि, ‘ठाकरे-पवार मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत’, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर टीका करताना सांगितले की, ‘केंद्र सरकारचा ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणाशी काय संबंध आहे. याचा राज्याशी संबंध आहे. राज्याची भूमिका आहे. राज्याने निर्णय घ्यायचा आहे. तुम्ही ऐवढ्या दिवस सत्तेत होता. शरद पवार यांची नेहमी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका राहिली आहे. हे लपून नाही आहे. त्यांच्या सरकारमधील जीआर पाहिले तर त्यावेळीही मराठा समाजाला त्यांना आरक्षण देता आले असते. मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात मागासवर्गीयांसारख्या सवलती देता आल्या असत्या. पण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शरद पवार यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही आणि आता मराठा आरक्षणावर शरद पवार बोलत आहे हे आश्चर्य आहे.’
चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, ‘आपले सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोर्टामध्ये केस लढली नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना योग्य वकील लावले नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे आरक्षण गेले. जे आमचे महायुतीच्या देवेंद्र फडणवीसांनी दिले. आता तुम्ही बोंबा मारत आहेत. कुठल्या अधिकाराने बोंबा मारत आहेत. मराठा आरक्षणाचे मारेकरी हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत. भारतीय जनता पार्टी आणि महायुती हे ओबीसी आणि मराठा समाजाला संरक्षण देणारे आमचे महायुतीचे सरकार आहे.’