
जळगाव मिरर | २९ मार्च २०२६
चंद्रपूर जिल्ह्यात घडलेली एक धक्कादायक आणि अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली असून, एका पोलिस कर्मचाऱ्यानेच स्वतःच्या पोलिस असलेल्या वडिलांची विष देऊन हत्या केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार तब्बल तीन वर्षे दडवून ठेवण्यात आला होता. मात्र, वैवाहिक वादातून अखेर या हत्याकांडाचा भांडाफोड झाला असून संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयंत बल्लावार (वय ४५) हे पोलिस अधिकारी २५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ड्युटीवर जाण्यासाठी घराबाहेर पडले. त्यावेळी त्यांची मुलगी आर्या बल्लावार हिने त्यांना मिल्कशेक बनवून दिला. तो पिऊन जयंत बल्लावार चंद्रपूर जिल्हा न्यायालयाच्या प्रशासकीय इमारतीत पोहोचले. मात्र, काही वेळातच त्यांना चक्कर येऊन ते खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्या वेळी हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे गृहित धरून कोणतीही संशयास्पद बाब समोर आली नव्हती. त्यामुळे प्रकरणाची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करून फाईल बंद करण्यात आली होती.
मात्र, तीन वर्षांनंतर या प्रकरणाने नाट्यमय वळण घेतले. पोलिस तपासात उघड झाले की, जयंत बल्लावार यांचा मृत्यू हा पूर्वनियोजित खून होता. आर्या बल्लावार हिचे आशिष शेडमाके या तरुणाशी २०२२ पासून प्रेमसंबंध होते. वडिलांचा या नात्याला विरोध असल्याने ते त्यांच्या मार्गात अडथळा ठरत होते. त्यामुळे आर्यानेच वडिलांना संपवण्याचा कट रचल्याचे समोर आले.
या कटात तिने आपला नातेवाईक चैतन्य गेडाम (वय २२) याची मदत घेतली. त्याला पैसे देऊन विष आणण्यास सांगितले. त्यानंतर २५ एप्रिल २०२३ रोजी मिल्कशेकमध्ये विष मिसळून ते वडिलांना दिले. ते पिल्यानंतरच जयंत बल्लावार यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आर्याची अनुकंपा तत्त्वावर पोलिस खात्यात नियुक्ती झाली. पुढे तिने आशिष शेडमाके याच्याशी विवाह केला. मात्र, काही काळानंतर दोघांमध्ये वाद वाढले. अखेर संतापाच्या भरात आशिषने पोलिस ठाण्यात जाऊन संपूर्ण हत्याकांडाची माहिती दिली आणि प्रकरणाचा भांडाफोड झाला.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी आर्या बल्लावार, आशिष शेडमाके, चैतन्य गेडाम यांच्यासह आणखी एका संशयिताला अटक केली आहे. या प्रकरणात वापरण्यात आलेले विष नेमके कुठून आणले, तसेच इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. या धक्कादायक घटनेमुळे पोलिस दलासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, एका मुलीनेच स्वतःच्या वडिलांचा खून केल्याच्या प्रकाराने सर्वत्र संताप आणि आश्चर्य व्यक्त होत आहे.





















