
जळगाव मिरर | २३ ऑगस्ट २०२३
राज्यातील अनेक शहरात मारहाण व धमकीच्या घटना प्रत्येक शहरात नित्याच्या झाल्या आहे. पण एक प्रकरण नाशिक जिल्ह्यातील समोर आले आहे. चक्क दहावीत शिक्षण घेणाऱ्या १६ वर्षीय मुलीच्या घरी येवून तिच्या वडिलांना तीन तरुणांनी धमकी दिल्याने अल्पवयीन मुलीने टोकाचे पाऊल उचलले आहे. हि घटना सिन्नर तालुक्यातील शहा या गावी घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहा गावातीलच तीन तरुणांनी दहावीत शिकणाऱ्या वैष्णवी नवनाथ जाधव (१६) हिच्या घरी येऊन तिच्या वडिलांची गच्ची धरून शिवीगाळ, दमदाटी केली. “तू जगण्याच्या लायकीची नाही; जीव दे, अन्यथा आम्हीच तुझा गेम करतो,’ अशी धमकी दिल्याने हा त्रास सहन न झाल्याने वैष्णवीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नातेवाइकांनी मृतदेह पोलिस स्टेशनसमोर आणल्यानंतर तीन संशयीतांवर गुन्हा दाखल झाला. सोमवारी (२१ आॅगस्ट) रात्री १ वाजेच्या सुमारास सिन्नर औद्योगिक वसाहतीत एका कारखान्यात नोकरीस असलेले वैष्णवीचे काका जालिंदर जाधव घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.आपल्या मृत्यूला जबाबदार असलेल्या तीन तरुणांच्या नावे तिने चिठ्ठी लिहिलेली आहे. मुलीचे वडील नवनाथ कारभारी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुख्य संशयित वैभव विलास गोराणे (१८) आणि त्याचे साथीदार अंकुश शिवाजी धुळसैंदर (१८) व आणखी एक अल्पवयीन या तिघांविरोधात वावी पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वैभव हा कोळपेवाडी महाविद्यालयात एफवायबीएला आहे. अंकुश सध्या घरीच आहे. तिसरा अल्पवयीन सिन्नर येथील एका अकॅडमीत लष्कर भरतीचा सराव करतो. शवविच्छेदनानंतर वैष्णवीच्या नातलगांनी मृतदेह वावी पोलिस स्टेशनच्या दारात आणला. गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही, अशी भूमिका घेतली. गुन्हा दाखल झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
काय लिहले चिठ्ठीत
मी जीव देण्याचं कारण फक्त वैभव गोराणे. हा खूप नालायक मुलगा आहे. तो आतापर्यंत खूप मुलींसोबत नालायक वागला. त्यातलीच मी पण एक आहे. माझ्यासोबत पण खूप घाण वागलाय. आणि आता… हिच्या सोबत वागतोय. त्याला शिव्या देण्याचं कारण आहे की तो लोकांना माझ्याविषयी नको ते वाईट बोलायचा. अंकुश धुळसैंदर, (अल्पवयीन असल्याने नाव प्रसिद्ध केलेले नाही) हे दोन त्याचे मित्र प्रत्येक घाण वागणुकीला मदत करत होते. आणि हा दोन चिठ्ठ्या घेऊन माझ्या दारात येऊन माझ्या वडिलांची गच्ची धरणारा हा कोण! आणि माझ्याकडे याच्याविषयी शंभर पुरावे असते पण मला माहीत नव्हतं हा इतका नालायक मुलगा आहे. यात माझी पण चूक होती आणि मला माहीत होतं की हे माझ्या वडिलांना कळल्यावर ते मला मारतील. त्यामुळे मी आत्महत्या केली आणि याला जबाबदार फक्त आणि फक्त याचे दोन मित्र आणि हा आहे. आणि या गोराणे टीमला मुळापासून नाही संपवलं तर शहा गावात हे होत राहणार. आणि श्री भैरवनाथ हायस्कूलमध्ये पण असेच आत्ता उद्योग होत आहेत.






















