
जळगाव मिरर । १८ ऑक्टोबर २०२२
प्रेम हे आंधळे असते असे म्हणतात पण प्रेमात दोन लग्न करू शकतो हे पण खरे आहे, पण एक पत्नी असताना दुसरीला न सांगता लग्न केल्याची घटना जळगावात उघडकीस आली आहे. या नंतर हे प्रकरण पोलिसात गेल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन पती व सासरच्या मंडळींसह मध्यस्थी करणाऱ्यांविरुद्ध फसवणूक व अत्याचार केल्याचा गुन्हा 18 ऑक्टोबर मंगळवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील जीवननगरात राहणाऱ्या सत्यजित रवींद्र सोनवणे याचे पहिले लग्न दीपीका या तरुणीसोबत झाले आहे. तरी देखील भाग्यश्री यांच्याशी दुसरे लग्न ठरविण्यासाठी त्याचे सत्यजित सोनवणे त्याचे वडील रवींद्र चिंधू सोनवणे, आई उषा सोनवणे बहीण दिपाली सुधिर शिंदे, किरण अशोक यशवंद, सुदर्शन वाल्हे हे गेले होते. त्यांनी सत्यजितचा पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाल्याचे सांगून त्यानंतर दुसरा विवाह झाला नसल्याची हमी सुशिल बागुल यांच्यासमक्ष दिली होती. त्यानंतर ठरल्याप्रमाणे भाग्यश्री यांच्याशी 22 मे 2021 रोजी लग्न केले.
भाग्यश्री ह्या पतीसह सासरी नांदत असतांना त्यांना पती सत्यजीत यांच्या मोबाईलमध्ये एका महिलेसोबत लग्नाचे फोटो दिसले. त्यांनी पतीला याबाबत विचारणा केली, परंतु त्याने शिवीगाळ करीत मारहाण करीत हे फोटो खोटे असल्याचे सांगितले. त्यानंतर भाग्यश्री यांनी माहेरच्यांना बोलावून घेत पतीसह सासरच्यांना जाब विचारला. यावेळी त्यांच्याकडून विवाहितेच्या सासरच्यांना देखील मारहाण करण्यात आली. मारहाणीच्या घटनेनंतर 8 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच वडीलांनी15 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, 10 ग्रॅमचे कानातले टोंगल व पतीला 5 ग्रॅमची अंगठी असे दिले होते. परंतु, सासरच्यांनी एक महिना चांगली वागणूक दिली त्यानंतर त्यांच्याकडून मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला.
पतीची पहिली पत्नी असल्याचे माहिती असून त्याच्या कुटुंबियांनी त्याचा दुसरा विवाह करीत विवाहितेची फसवणुक केल्याप्रकरणी मंगळवारी सत्यजित सोनवणे त्याचे वडील रविंंद्र चिंधू सोनवणे, आई उषा सोनवणे, बहीण दिपाली सुधिर शिंदे, किरण अशोक यशवंत, सुदर्शन वाल्हे यांच्याविरुद्ध फसवणुक व विवाहितेचा छळ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख तपास करीत आहेत.




















