
जळगाव मिरर | ११ ऑक्टोबर २०२४
शहराकडून विटनेर तांडा येथे जात असलेल्या दुचाकीस्वारांच्या दुचाकीला समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील कांतीलाल उर्फ कान्हा रमेश राठोड (वय २४) व रविंद्र किसन चव्हाण (वय ३०, दोघ रा. विटनेर तांडा, ता. जळगाव) यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार दि. १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शिरसोलीजवळील आकाशवाणी केंद्राजवळ घडली. धडक देणाऱ्या कारसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील विटनेर तांडा या गावात कांतीलाल राठोड आणि रवींद्र चव्हाण हे वास्तव्याला होते. गुरुवारी दुपारच्या सुमारास ते कामानिमित्त जळगावला आले होते, काम आटोपून ते (एमएच १९ इएल ०३११) क्रमांकाच्या दुचाकीने घराकडे जाण्यासाठी निघाले. शहरापासून काही अंतरावर असलेल्या शिरसोलीगावाजवळील आकाशवाणी केंद्राच्या टॉवरसमोर शिरसोलीकडून जळगावकडे भरधाव वेगाने येत असलेल्या (एमएच ०२, सीबी ५४४१) क्रमांकाच्या कारने दुचाकीला समोरुन जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार हे रस्त्यावर फेकल्या गेल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अधिकार पाटील, पोकों शुद्धोधन ढवळे, साईनाथ मुंढे, संभाजी सरोदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही नागरिकांच्या मदतीने त्यांनी जखमींना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या कांतीलाल राठोड व रविंद्र चव्हाण यांच्यावर अधिकाऱ्यांनी उपचारी, वैद्यकीय करण्यास सुरुवात केली. मात्र उपचार सुरु असतांना त्या दोघांची प्राणज्योत मालवली. कारने दिलेली धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीच्या समोरील चाकाचा पुर्णपणे चुराडा झाला होता. अपघातात विटनेर तांडा येथील दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती गावात कळताच, ग्रामस्थांसह दोघांच्या कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. याठिकाणी दोघांचा मृतदेह बघताच त्यांनी हंबरडा फोडीत आक्रोश केला. दरम्यान, यावेळी मयताच्या नातेवाईकाला भुरळ आल्याने तात्काळ उपचारार्थ दाखल करण्यात आले. कांतीलालच्या पश्चात आई आणि मोठा भाऊ तर रवींद्र चव्हाण यांच्या पश्चात पत्नी काका, आजोबा आणि काकू असा परिवार आहे.





















