जळगाव मिरर | १ मार्च २०२५
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश आल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते नेहमीच महायुतीवर आरोप प्रत्यारोप करीत असतांना आता महायुतीमधील शिंदेंच्या नेत्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीकास्त्र डागल्याचे पाहायला मिळाले.
माजी मंत्री रामदास कदम म्हणाले कि, ‘उद्धव ठाकरेंना उद्धवस्त केल्याशिवाय राहणार नाही’, तर राज्यातून उद्धवस्त केल्याशिवाय रामदास कदम नाव सांगणार नाही, असं म्हणत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना थेट इशारा दिला आहे. हा इशारा देत असताना उद्धव ठाकरे यांनी योगेश कदम यांना संपवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केला. दरम्यान, रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांवर आणि टीकेवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्याकडून पलटवार करण्यात आला आहे. एक दिवस तुम्हाला पुन्हा मातोश्रीच्या दारात यावं लागेल, असा दावा संजय राऊत यांनी केलाय. ‘उद्धव ठाकरेंना उद्धवस्त करण्याचं त्यांच्या आयुष्यातील जर ते ध्येय असेल तर करूद्या.. तुमचं हे फडफडणं तात्पुरतं आहे. सत्ता आहे तोपर्यंत तुमचं फडफडणं आहे. पण एकदिवस तुम्हाला पुन्हा मातोश्रीच्या दारात यावं लागेल हे माझं भाकित नसून माझा दावा आहे.’, असं वक्तव्य संजय राऊत यांनी करत रामदास कदमांवर निशाणा साधलाय.
