
जळगाव मिरर | २१ मे २०२५
राज्यातील महायुती व महाविकास आघाडी पक्षातील आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता भाजपचे नेते व मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल चढविला आहे. आपण काय बोलतो आणि त्याच्यावर समोरच्याची काय प्रतिक्रिया येऊ शकते याचे भान सुटलेला नेता, बेभान नेता म्हणजे उद्धव ठाकरे, अशी टीका मंत्री शेलार यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी गेल्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना म्हटले होते की, देवेंद्र एक तर तू राहशील नाहीतर मी राहील. यावरून आशिष शेलार यांनी खोचक टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीत जनतेने दाखवले आहे की भाजप आणि देवेंद्रजी कुठे आहेत आणि उद्धव ठाकरे कुठे राहिले? असा सवाल शेलारांनी केला आहे.
आशिष शेलार म्हणाले, मुंबईकर या निवडणुकीत दाखवतील उद्धवजी तुम्ही कुठे असाल. तुम्ही जी पोपटपंची केली त्याचे उत्तर मिळाले. मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीत आम्ही लढणार आहोत आणि जिंकणारही आहोत. 50 पेक्षा कमी जागा महाविकास आघाडीला मुंबई महापालिका निवडणुकीत मिळणार असल्याचे देखील शेलार म्हणाले.
मुंबईकरांचा सेवेकरी कोण? याच मुद्द्यावर मुंबई महापालिका निवडणूक होणार आणि महायुती जिंकणार असल्याचे आशिष शेलार म्हणाले. मागच्या दीड वर्षांपासून भाजप तयारी करत आहे. मतदारांचा मतदानापुरता विचार करणे हे भाजपचे धोरण नाही. मी मुंबईभर फिरतोय आणि ज्या प्रकारे मला दिसते आहे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईकडे पाठ दाखवली आहे. ते नाल्यांवर रस्त्यांवर कुठेही दिसत नाही. ते फक्त टीव्हीवर दिसतात. टीव्हीवर दिसून मत मिळतात हा गैरसमज आहे. रोज बडबड करणाऱ्या उबाठा नेत्यांना मुंबईशी काही घेणेदेणे नसल्याची टीका शेलारांनी केली.
छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना आशिष शेलार म्हणाले, छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्याचा निर्णय तिन्ही पक्षाने मिळून ठरवला आहे. तिन्ही पक्षाचे नेते विचारपूर्वक निर्णय घेतात. आमच्यावर टीका करणारे घरात बसून आहेत. त्यांनी रस्त्यावर यावे. जनतेच्या त्यांच्याबद्दल काय भावना आहेत त्या समजून घ्याव्यात. त्यानंतर त्यांना त्यांचे स्थान कळेल, असेही शेलार म्हणाले.





















