
जळगाव मिरर । २० सप्टेंबर २०२५
राज्याच्या राजकारणातील नेते मंडळी आरोप प्रत्यारोप करीत असतांना पातळी सोडून बोलत आहे, त्यामुळे राज्याच्या राजकारणात वाद निर्माण होण्याची शक्यता असताना आता अकोल्यातील शेतकरी संवाद सभेत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी आक्रमक पावलं उचलावी लागतील, असे तुपकर म्हणाले. सभेत भाषण करताना त्यांनी थेट इशारा देत म्हटले, नेपाळमध्ये ‘जेन-झी’ आंदोलनादरम्यान जनता रस्त्यावर उतरली होती आणि सरकारला हादरे बसले होते. आपल्या शेतकऱ्यांनाही न्याय हवा असेल, तर दोन-चार मंत्र्यांना तुडवल्याशिवाय ही व्यवस्था कधीच जागी होणार नाही.
याचवेळी मंचावर उपस्थित असलेले भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांना आवाहन करताना म्हटले की, आपली जमीन हीच खरी संपत्ती आहे. ती विकू नका, कारण जमीन विकली तर पुढील पिढीचे भविष्य अंधारात जाईल.
या सभेत बोलताना ‘प्रहार’चे नेते बच्चू कडू यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या जळगाव येथील आंदोलनानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यांचा उल्लेख केला. जळगावातील आंदोलनात आम्ही फक्त जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडलं. यानंतर राज्यात होणाऱ्या आंदोलनात आम्ही आता थेट कलेक्टरलाच तोडू, असा वादग्रस्त इशारा बच्चू कडू यांनी दिला. सभेदरम्यान, शेतकरी कर्जमाफी, पिकांना योग्य हमीभाव आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणीही करण्यात आली.




















