जळगाव मिरर / २ नोव्हेंबर २०२२
राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील गट क मधील लिपिक वर्गीय पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतचा शासन निर्णय आज रोजी जारी करण्यात आला आहे. राज्यातीत सर्व शासकीय कार्यालयांतील लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंता ही पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यासंदर्भातील सकारात्मक प्रस्ताव राज्यसेवा आयोगाने शासनास सादर केला होता. त्यामुळे ही पदे ‘एमपीएससी’मार्फत भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयामुळे लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंतापदांच्या भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या राज्यातील अ आणि ब गटातील अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत केली जाते. राज्य लोकसेवा आयोगाच्या कार्यक्षमतेचा विचार करून मुंबईप्रमाणेच राज्यभरातील लिपिकांची देखील रिक्त पदे आयोगामार्फतच भरण्यात यावीत, असे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले होते.
राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील गट क मधील लिपिक वर्गीय पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतचा शासन निर्णय आज रोजी जारी करण्यात आला आहे. https://t.co/Ggz79rmZSQ pic.twitter.com/zs1dXL2T1m
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) November 2, 2022
यापूर्वी काही विभागांच्या परीक्षा विविध कारणांनी रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे उमेदवारांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागला होता; परंतु आता लिपिक, टंकलेखक व कनिष्ठ अभियंता ही पदे ‘एमपीएससी’मार्फतच भरण्यात येणार असल्याने पारदर्शी पद्धतीने भरती होणार आहे.
