
जळगाव :प्रतिनिधी
शाहू महाराज हे बहुजनांना शिक्षण, आरक्षण, जातीभेद निर्मूलन आणि स्त्रीमुक्तीसाठी कार्य करणारे असे सुधारणावादी आणि खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी लोकराजे होते, असे मत जेष्ठ रंगकर्मी शंभू पाटील ह्यांनी महाराजांच्या शंभराव्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र आणि विचारधारा प्रशाळेत सदर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून बाल गंधर्वापर्यंत भेदाभेद न करता अनेकांना सढळ हस्ते मदत करणारे, थोर समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ६ मे रोजी शंभरावी पुण्यतिथी आहे. शाहू महाराजांच्या विस्तृत आणि व्यापक कार्याचा पाटलांनी थोडक्यात आढावा घेतला.
ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या एकूणच सामाजिक उन्नतीसाठी लढणारे, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून प्रस्थापित वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका महाराजांनी बजावली. *भेदाभेद न करता मुलांच्या शिक्षणासाठी शाळा, महाविद्यालये, वसतीगृहे त्यांनी निर्माण करून त्यांनी पिढ्यानपिढ्या चालत आलेली निरक्षरता नष्ट केली.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रशाळेचे संचालक प्रा अनिल डोंगरे ह्यांनी भूषविले तर प्रा डॉ विजय घोरपडे ह्यांनी सूत्र संचालन केले तर डॉ अतुल बारेकर ह्यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. मंचावर प्रा मधूलिका सोनवणे, डॉ चव्हाण, प्रा रमेश सरदार आदी मान्यवर उपस्थीत होते.