
जळगाव मिरर | १६ एप्रिल २०२६
साकोली तालुक्यात मानव-वन्यजीव संघर्षाने गंभीर वळण घेतले असून, सलग घडणाऱ्या हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे सावट गडद झाले आहे. नरभक्षक वाघिणीच्या दहशतीत भर घालत बुधवारी (दि. १५ एप्रिल) पहाटे विर्शी परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
आशिका काशिनाथ मिरी (वय ५) असे मृत बालिकेचे नाव असून, ती छत्तीसगड राज्यातील बलोदा बाजार जिल्ह्यातील सुहेला गावची रहिवासी होती. कुटुंबासह ती विर्शी येथे वीटभट्टीवर कामासाठी आली होती. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाविरोधात नागरिकांचा रोष तीव्र झाला आहे.
बुधवारी पहाटे सुमारे ५ वाजता कुटुंब झोपेत असताना शेतातील मक्याच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. काही कळण्याच्या आतच त्याने चिमुकलीला जबड्यात पकडून ओढून नेले आणि ठार केले. या भीषण घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
साकोली तालुक्यात यापूर्वीच एका नरभक्षक वाघिणीने दोन जणांचा बळी घेतला असून, आणखी एका महिलेला गंभीर जखमी केले आहे. १९ मार्च रोजी बांपेवाडा येथील वसंता मेश्राम यांच्यावर पहिला हल्ला झाला. त्यानंतर २८ मार्चला उमरझरी येथील माया सोनवणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर १ एप्रिलला आमगाव येथील छाया मूंगमोडे या गंभीर जखमी झाल्या. या घटनांमुळे वाघिणीने नरभक्षक रूप धारण केल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये सध्या वाघ आणि बिबट्यांचा वावर वाढला आहे. टी-२७ या नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी वनविभागाचे १७० हून अधिक कर्मचारी गेल्या २६ दिवसांपासून रात्रंदिवस जंगलात शोधमोहीम राबवत आहेत. मात्र ही वाघीण अद्याप हाती लागलेली नाही. त्यातच विर्शी येथे बिबट्याच्या हल्ल्याची ही चौथी घटना ठरल्याने वनविभागासमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे. एकीकडे नरभक्षक वाघिणीला जेरबंद करणे आणि दुसरीकडे बिबट्याचा बंदोबस्त करणे, हे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
या सलग घटनांमुळे साकोली तालुक्यातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. शेतात काम करणे, घराबाहेर पडणेही धोकादायक झाले आहे. संतप्त नागरिकांनी वनविभागाने तात्काळ कठोर पावले उचलून संबंधित वन्यप्राण्यांना जेरबंद करावे, अशी जोरदार मागणी केली आहे. दरम्यान, वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी जीवाची पर्वा न करता जंगलाचा कानाकोपरा पिंजून काढत असून, लवकरच या हिंस्र प्राण्यांना पकडण्यात यश मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.





















