जळगाव मिरर | २६ मे २०२५
जगभरात सन २०१९ मध्ये कोरोना आजाराचे थैमान झाले असतांना आता पुन्हा एकदा देशभरात कोरोना रुग्णसंख्ये चिंताजनक वाढ झाली आहे. गेल्या एका आठवड्यात देशात कोरोनाचे ७५२ नवीन रुग्ण आढळले. या कालावधीत ३०५ जणांनी कोरोना संसर्गावर मात केली. चिंताजनक बाब म्हणजे, गेल्या सात दिवसांत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सात इतकी नोंदली गेली आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील चार, केरळमधील दोन आणि कर्नाटकातील एका रुग्णाचा समावेश आहे.
गेल्या एका आठवड्यात (१९ मे नंतर) केरळमध्ये सर्वाधिक ३३५, महाराष्ट्रात १५३, दिल्लीत ९९, गुजरातमध्ये ७६ आणि कर्नाटकात ३४ नवे काेराेना रुग्णांची नाेंद झाली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, साेमवार २६ मे रोजी सकाळी ८:०० वाजता देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १००९ इतकी आहे.
केंद्र सरकारच्या एजन्सी इंडियन SARS-CoV-2 जीनोमिक्स कन्सोर्टियम (Insacog) च्या ताज्या आकडेवारीनुसार,केरळमध्ये सर्वाधिक ४०३ कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत २०९ आणि दिल्लीत १०४ प्रकरणे नोंदली गेली आहेत. या शहरांनंतर गुजरातचा क्रमांक लागतो. येथे ८३ नवे काेराेना रुग्ण सापडले आहेत. कर्नाटकात ४७, उत्तर प्रदेशात १५ आणि पश्चिम बंगालमध्ये १२ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. न
कोरोना रुग्णसंख्येत होणार्या वाढीबाबत ‘पीटीआय’शी बोलताना दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या की, रुग्ण संख्या वाढत आहे म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही. दिल्लीतील रुग्णालये पूर्णपणे सज्ज आहेत. आमच्याकडे रुग्ण संख्याची माहिती आहे. रुग्णालयांमध्ये सर्व सुविधा आहेत. नागरिकांनी कोणती सतर्कता बाळगावी, यासाठी उपाययोजनाही केल्या आहेत. दरम्यान, केंद्रीय आरोग्य सचिवांनी शनिवारी देशभरातील रुग्णसंख्येचा आढावा घेतला. केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये कोरोना रुग्ण आढळले आहेत.बहुतेक प्रकरणे सौम्य आहेत आणि रुग्ण घरीच उपचार घेत आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
