जळगाव मिरर / १० मार्च २०२३ ।
राज्यातील शेतकरी अवकाळी आणि गारपीट यामुळे त्रस्त असतांना यात अवकाळी पावसाचे पंचनामे सुरू आहे तर राज्यातील 36 तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या मुद्यावरुन देखील विरोधक आज सभागृहात आक्रमक होण्याची शक्यता आहे.
राज्यात अवकाळी पावसामुळे अनेक भागांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यामुळे विधिमंडळात विरोधकांनी या मुद्द्यावरुन आक्रमक पवित्रा घेतला होता.
अनेकदा या मुद्यावरुन सभागृह तहकूबही करण्यात आलेले, सरकारच्या वतीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. काही ठिकाणी पंचनामे सुरू आहेत, आणि त्यात हा बदल्याचा आदेश आल्याने आज सभागृहात विरोधक आक्रमक होऊ शकतात. अवकाळी आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याची जबाबदारी तहसीलदार आणि इतर यंत्रणावरती आहे. यात 36 तहसीलदारांच्या बदल्या केल्याने शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यास विलंब होणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.
राज्यात आठ जिल्ह्यात या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शेतकरी नुकसानीच्या मुद्यावरुन विरोधक आक्रमक झाले होते. त्यावेळी विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना फडणवीसांनी विधीमंडळात ही माहिती दिली. सदरील आदेश तात्काळ अंमलात येत असून उपरोक्त नमूद अधिकारी यांना बदलीने पदस्थापना दर्शविण्यात आलेल्या पदावर तात्काळ रुजू होण्यासाठी ते धारण करीत असलेल्या पदावरुन या आदेशान्वये एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत येत आहे. त्यांनी त्यांच्या पदस्थापनेच्या पदावर दि.13.03.2023 रोजी (म.पू.) रुजू होणे अनिवार्य आहे.
