
जळगाव मिरर / १६ एप्रिल २०२३ ।
राज्यातील शिंदे गटाचे मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा पक्ष प्रवेशावर वक्तव्य केल्याने चर्चेत आले आहे. गेल्या काही दिवसात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रस फुटण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार हे आपल्या काही आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे. संजय राऊत यांनीही काल भाजपचा राष्ट्रवादी फोडण्याचा डाव असल्याचे सांगत टीका केली आहे. मात्र आता खुद्द शिंदे गटाच्या आमदारानेच याबाबत महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
कोणतेही लग्न व्हायचे असेल तर तिथीची गरज असते. ती तिथी लवकरच येईल. अजित पवार हीच राष्ट्रवादी, जे बोलतील तोच आमदारांचा आकडा असेल, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. अजित पवार आपल्यासोबत 15 आमदारांना भाजपमध्ये घेऊन जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्याची चर्चा होत आहे.
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
गुलाबराव पाटील म्हणाले, अजित पवारांसोबत बरेच आमदार आहे. मात्र, कोणत्याही लग्नासाठी तिथी आवश्यक आहे. सध्या अजित पवार हीच राष्ट्रवादी आहे. अजून कुळ बघावे लागेल. गुण जुळवावे लागतील व नंतरच ते काम करावे लागेल. आकडा ते सांगतील तो असेल तोच असेल, असाही पुनरुच्चार त्यांनी केला. नागपूरमध्येही महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा होणार असून ही सभा वज्रमूठ आहे की फुटलेली मुठ आहे हे उद्या दिसेल अशी टीका मंत्री गुलाबराव पाटलांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार लवकरच भाजपमध्ये जाणार आहेत, असा दावा अंजली दमानिया यांनी केला होता. राज्यात एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या जवळकीची चर्चा रंगली असतानाच अंजली दमानियांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळाच चांगलीच चर्चा रंगली. अंजली दमानिया यांनी ट्विट करुन हा दावा केला आहे. ट्विटमध्ये अंजली दमानिया यांनी म्हटले आहे की, आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवले आणि एक गमतीशीर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत. तेही लवकरच. बघू आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची.





















