
जळगाव मिरर | ७ मे २०२५
भारतीय सैन्याने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. बुधवारी मध्यरात्री १ वाजून पाच मिनिटांनी ते दीड वाजेपर्यंत…. अशा २५ मिनिटांमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्याचे 9 तळ उद्ध्वस्त केले. दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांना भारतीय सैन्याने लक्ष्य केले. पहलगामच नव्हे तर भाविकांच्या बसवरील गोळीबार, 26/11 मुंबई हल्ला, जम्मू- काश्मीर पोलीस दलातील जवानांची हत्या अशा पाच ते सहा हल्ल्यांचा बदलाच भारतीय सैन्याने घेतला आहे.
बुधवारी सकाळी साडे दहा वाजता परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यात परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी एअर स्ट्राईकची सविस्तर माहिती दिली.
पहलगाम हल्ला हा जम्मू- काश्मीरमधील पर्यटन आणि विकासकामात अडथळे आणण्यासाठी करण्यात आला होता. या हल्ल्याच्या तपासादरम्यान भारताच्या गुप्तचर यंत्रणांना अशी माहिती मिळाली होती की, दहशतवादी संघटना आणखी हल्ले करण्याच्या तयारीत आहेत. या दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितले.
परराष्ट्र मंत्रालयानंतर भारतीय संरक्षण विभागाच्यावतीने कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी कारवाईची माहिती आणि व्हिडिओ माध्यमांना दाखवले. या कारवाई नऊ तळांना उद्धवस्त करण्यात आले. पाकीस्तानमध्ये गेल्या तीन दशकांपासून दहशतवादी संघटनांचे केंद्र उभे राहत आहेत. हे तळ पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये आहेत. या कारवाईदरम्यान निर्दोष नागरिक आणि नागरी वस्तींचे नुकसान होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात आले, असे सैन्याने सांगितले.
सवाई नाला कॅम्प हे लष्कर- ए- तोयबाचे प्रशिक्षण केंद्र होते. 20 ऑक्टोबर 2024 सोनमर्ग, 24 ऑक्टोबर 2025 गुलमर्ग आणि 22 एप्रिल 2025 पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांनी याच केंद्रांमदून प्रशिक्षण घेतले होते.
जैश- ए- मोहम्मदचे तळ असून स्फोट घडवणे, जंगलातील कारवाया याचं प्रशिक्षण या केंद्रामध्ये दिले जात होते.
लष्कर- ए- तोयबाचं हे तळ होते. पूँछ आणि राजौरी भागात हे दहशतवादी सक्रीय होते. 20 एप्रिल 2023 मधील पूँछ येथे आणि 9 जून 2024 मधील यात्रेकरूंच्या बसवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी याच तळावर प्रशिक्षण घेतले होते.
- अब्बास कॅम्प, कोटली, नियंत्रण रेषेपासून 13 किमी
लष्कर- ए- तोयबाचे प्रशिक्षण केंद्र. आत्मघाती हल्ल्यांचे प्रशिक्षण दिले जायचे. एकाच वेळी किमान 15 दहशतवाद्यांना येथे प्रशिक्षण दिले जात होते.
मार्च 2025 मध्ये जम्मू- काश्मीर पोलिसांच्या जवानांची हत्या करण्यात आली होती. त्या दहशतवाद्यांना येथेच प्रशिक्षण देण्यात आले होते.
आंतरराष्ट्रीय सीमेपासून 12 ते 18 किलोमीटर लांब होते. हिज्बुल मुजाहिद्दीनचं केंद्र होते. जम्मूमध्ये दहशतवाद पसरवण्यामागे याच केंद्रातील दहशतवाद्यांचा हात होता. पठाणकोट एअर बेसवरील हल्ल्याची सूत्रे याच केंद्रावरून हलली होती.
26 नोव्हेंबर 2011 रोजीच्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांनीही येतेच प्रशिक्षण घेतले होते. अजमल कसाब, डेव्हिड हेडली हे दोघंही इथेच प्रशिक्षणासाठी गेले होते. जैश- ए- मोहम्मदचे मुख्यालय होते. संघटनेचा म्होरक्याही या केंद्रात यायचा.





















