जळगाव मिरर | १० ऑगस्ट २०२६
चोपदड तालुक्यातील विजेच्या खांबावर चढून ग्रामपंचायतीचे पथदिवे बसवण्याचे काम करत असताना अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने विजेचा शॉक लागून झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गणपूर येथे शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील चौगाव येथील रामचंद्र भिला पाटील (वय ४०) हे गावासह परिसरात झिरो वायरमनचे काम करत होते. दरम्यान, ८ ऑगस्टला गणपूर येथे ग्रामपंचायतीचे पथदिवे बसवण्याचे काम करण्यासाठी रामचंद्र पाटील हे गेले होते. शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास रामचंद्र भिला पाटील हे विजेच्या खांबावर चढून ग्रामपंचायतीचे पथदिवे बसवत असताना वीज तारांमध्ये अचानक रिव्हर्स वीज प्रवाह आल्याने विजेचा शॉक लागल्याने ते खाली पडले. या दुर्दैवी अपघातात झिरो वायरमन रामचंद्र पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सकाळी ११ वाजता घडली.
घटनेची माहिती मिळताच लासूर येथील ३३ केव्ही सबस्टेशन अंतर्गत असलेले इंजिनियर संदीप राजपूत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी झिरो वायरमन पाटील यांना नागरिकांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. तर डॉ. गौरव नेवे यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर रामचंद्र पाटील यांच्यावर शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास चौगाव येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.




















