जळगाव : प्रतिनिधी
शहरात अमृत आणि भुयारी गटारी योजनेची कामे झाल्यामुळे जळगाव शहराच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या २.५ वर्षांपासून महाविकास आघाडी सरकार च्या काळात जळगाव शहरात विकास कामांना अडथळा निर्माण झाला असून शहरात विविध विकास कामे ठप्प झालेली आहेत. शहराच्या विकासाच्या दृष्टीने आ.सुरेश भोळे यांनी रस्त्यांच्या कामांकरिता नुकतेच ०५ कोटी रुपये निधी मंजूर केला. त्याचबरोबर शहरात विविध विकासकामे व रस्त्यांची कामे करणेसाठी आ.सुरेश भोळे यांनी दि.१३ जुलै, २०२२ रोजी मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अंतर्गत १०० कोटी निधी मिळावा या मागणीचे पत्र दिले आहे.
सदरचा निधी उपलब्ध झाल्यास शहरात अनेक विकास कामांना चालना मिळेल व शहराचा चेहरा मोहरा बदल्यासाठी मदत होईल आणि नागरिकांना समस्यांपासून दिलासा मिळेल.
रस्त्यासाठी होताहेत आंदोलने
गेल्या कित्येक वर्षपासून शहरातील रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर येऊन पडला आहे, तरीही मनपा प्रशासन याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे जनमानसातील आक्रोश आता रस्त्यावर पाहायला मिळत आहे. नुकतेच दि १४ रोजी शिवाजी नगर परिसरात नागरिक रस्त्यासाठी रस्त्यावर भरपावसात येऊन आंदोलन केले. याठिकाणी महापौर जयश्री महाजन यांनी आंदोलकांची समज काढून हे आंदोलन तूर्तास स्थगित करायला सांगितले परंतु नागरिक कुठलेही आश्वासन ऐकण्याच्याया मनस्थितीत नव्हते. नागरिकांना तात्काळ निर्णय हवा होता. तरी सौ.महाजन हे आंदोलकांची समज काढण्यासाठी यशस्वी झाले.




















